सूर संगत

Category:




कधी कधी अगदी एखदी छोटी गोष्ट मोठी गोष्ट घडवून आणते.  तबलावादक श्री संजय देशपांडे यांच्या फेसबुकवरच्या एका कमेंटमुळे ही गोष्ट सुरु झाली झाली व त्याची सांगता परवा आमच्या घरी अपूर्वा गोखले व पल्लवी जोशी यांची मैफल पार पडण्यात झाली. डॅलसला मैफल होणार होती पण विज़ाच्या अडचणी मुळे ती होऊ शकली नाही.  तरी पण पुन्हा एकदा डॅलसला मैफल करता येईल का अशी विचारणा मी केली व तत्परता दर्शवून संजय देशपांडे यांनी  घडवून आणली त्याबद्दल त्यांचे व सर्व कलाकारांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत.  ५ नोव्हेंबर तारीख ठरली.  फ्ल्यायर बनवायला घेतले. सर्व रसिकांना फेसबुक व ईमेल वर कार्यक्रमाबद्दल कळवले.  बघता बघता ५ तारीख उजाडली. घरात एखादे कार्य ठरावे तसा उत्साह संचारला होता.  जया दाते यांच्या कडून व्यासपीठ आणले. ५० लोक बसतील अशी आसन व्यवस्था केली. ऑस्टिन होऊन भूषण नानिवडेकर
अर्ध्या रस्त्या पर्यंत  कलाकारांना  घेऊन येणार होते व तिथून पुढे मी आणणार होतो.  सकाळी डॅलसहून निघालो. मला थोडा उशीर झाला. नानिवडेकरांनी अर्ध्याहून अधिक अंतर कापून माझे काम सोपे केले. भूरभूर पावसात परतीचा प्रवास सुरु झाला. अभिषेकी बुवांचे, वसंतरावांचे गाणे ऐकत व गाण्यावरच्या गप्पांमध्ये प्रवास सुरु होता. तास दिड तासात डॅलसला पोचलो. घरी पोचल्यावर गरमा गरम जेवण केले. वैदेही ने केलेली कढी खूप छान झाल्याचे सर्वांनी सांगितले.  मी अर्थातच आमच्य नवविगनत्वामुळे कढीचा मोह टाळला. नया नया मौला ज्यादा अल्ला अल्ला करता है या उक्तीस छेद देत मी मौन बाळगून होतो पण विगनत्वाबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याकरता मौन सोडावे लागले. असो आता  थेट मैफली बद्दल.


अपूर्वा  गोखले व पल्लवी जोशी यांच्या गाण्याबद्दल बरच ऐकून होतो.  त्यांच्या अमेरिका दौ-याबद्दल  झळकणाऱ्या पोस्ट्स वाचत होतो त्यामुळे उत्सुकता खूप होती. श्रोते मंडळींमध्ये सुभाष गायतोंडे, नारायण सरदेसाई, दिलीप राणे, किरण व कालिंदी साठ्ये, संजय व कल्याणी भट, जया दाते ही फाउंडिंग मेम्बर्स  असलेली जाणकार मंडळी उपस्थित होती.  क्षीरसागर मंडळी खास ओक्लाहोमा हून आली होती. शरद जांभेकरां  सारखे गायकही मैफलीला उपस्थित होते.  स्व. दिनेश कागलांची कमी जाणवत होती.

गायक व वादक स्थानापन्न झाले. श्री रागाची नोम तोम चीआलापी सुरु झाली. लगेच मनात सी आर व्यासांचा श्री ऐकू येऊ लागला. कोणाचाही श्री ऐकला की मला हाच श्री आठवतो. आलापी फुलावण्यातला दोन्ही गायिकांचा समन्वय पहिल्या मिनिटातच जाणवला.  हे खरे तर खूप अवघड आहे. दोन कलाकारांनी मिळून चित्र काढण्या सारखे आहे. एकाने काही फटकारे मारायचे व कुंचला दुस-याच्या हातात  द्यायचा. दुस-यानेही पहिल्या फटकाऱ्याशी सुसंगत पण आपला वेगळा फटकारा मारायचा. पण शेवटी चित्र एकच  काढायचे! अनेक वर्षांच्या एकत्र प्रवासाने व साधनेनेच हे शक्य आहे.  आलापीतून श्री रागाचा उठाव दाखवून "वारी जाउं रे" हा विलंबित तिलवाड्यातला गजानन बुवांनी रचलेला  खयाल सुरु केला.  संथ लयीत होणार विस्तार हळू हळू रंग भारत होता.  अधून मधून संवादिनीवर असलेले चिन्मय कोल्हटकर यांचे एखादे सुंदर आवर्तन येई.  स्वच्छ सूर, शुद्ध भाव प्रकट होत होते. सूर्यास्ताचा राग असला तरीही मला सूर्योदयाची उपमा द्यावीशी वाटत आहे. पहाटे रविकिरणे फाकत  जाऊन जसे हळू हळू जग दिसू लागते ताशा श्री रागाच्य छटा वातावरण उजळ करत होत्या.  वारी जाउं रे च्या  काही रोचक जागा दोघींच्या गायनात येत होत्या.  म प नी सां रें रें गं रें सां  चे सूर मनात घर करत होते.  ड्युअल इफेक्ट  खरंच छान होता.  लय जशी जशी वाढत होती तशी रंगात वाढत होती. आता संजय देशपांडेंचा तबला बोलू लागला होता व श्रोते हि डोलू लागले होते. "वाह वाह",  "क्या बात है" अशी दाद मिळू लागली. ताना, बोलबनाव, बोलाबाट व लयीला हाताळत  बंदिश पुढे सरकत होती.  नंतर "एरी हुतो आस" या तीन तालातल्या बंदिशीने रंगत  आणली.  पल्लवी जोशी यांचे वरचे स्वर लावण्याचे कसब दिसले.  दोन्ही गायिका कठीण जागा इतक्या सहजतेने लावत होत्या कि पहाणा-याला त्यात काय अवघड आहे असेच वाटावे.

या नंतर तिलक कामोद रागची सुरुवात झाली. माझ्या मनात मुकुलजींचा "बमना एक सुगन" सुरु झाला होता.  "सूर संगत" ही रूपकातली जयपूर वाल्यांची मध्यलयीतील बंदिश सुरु झाली.  श्रोत्यांना श्री  मधून बाहेर यायला वेळ  लागला असावा. पण थोड्याच अवधीत श्रोते  तिलक कामोदात हरवून  गेले.  दोन्ही गायिकांनी एकत्र गायल्याचा अप्रतिम इफेक्ट अजून मनात रुंजी घालत आहे. तदनंतर  "ता नुम  तनन" हा एकतालातला तराणा सुरु झाला.  कसलेल्या तानांनी तो अधिकच  सजला.
त्यानंतर  मध्यंतर झाला. मध्यंतरात  रसिकांनी चहाचा व चविष्ट समोस्यांचा आस्वाद  घेतला. अनेकांनी समोसे कोठून आणल्याची पृच्छा केली. पुढच्या मैफलीला  लोकांनी यावे म्हनून ते रहस्य उलगडले नाही.

मध्यंतरानंतर गौड मल्हार या रागाची सुरुवात झाली. गौड सारंग व मल्हार (बहुतेक शुद्ध) यांचा हा मिश्र राग.  "काहे हो" या मध्यलयीतील एकतालातल्या बंदिशीने राग मांडायला सुरुवात झाली.  कुमारजींच्या म्हणण्याप्रमाणे हा चलन प्रधान राग असल्याने चलनाला खूप महत्त्व आहे.  गौड मल्हाराचे छान झोकदार चलन यातून दिसत होते.  माझ्या आवडीचा राग असल्याने मला ऐकताना अंगावर काटे येत होते. तदनंतर "सैंय्या मोरया रे" ने  मैफिलीला कळस चढवला.  इतकी सुंदर मांडणी होती कि सांगता येत नाही.  केवळ अनुभवायची गोष्ट होती.  दोन्ही गायिकांच एकत्र गाणं , संजय देशपांडेंचा जोरकस तबला, व चिन्मय यांची लीलया फिरणारी संवादिनी पूर्ण फॉर्म मध्ये होते.  हि बंदिश आधी कुमारजींची ऐकून परिचयाची असली तरीही  नव्याने सापडल्या सारखी वाटली.  संदर्भासाठी खालील लिंक देत आहे.



त्यानंतर "अवधू माया ताजी न जाय" हे कबीरांचा निर्गुणी भजन पेश केलं.  चार वर्षांपूर्वी हे भजन मी पहिल्यांदा जेव्हा ऐकलं होत तेव्हांच माझी ब्रह्मानंदी टाळी लागली होती.  ते प्रत्यक्षात ते हि घरी ऐकण्याचा  योग्य येईल असं वाटलं नव्हत.  ज्यांनी पहिल्यांदा ऐकलं त्यांना सुद्धा खूप आवडल. त्याची सुरावटच खूप सुंदर आहे. हे भजन म्हणजे कळसावरचा फडफडणारा झेंडाच जणु.  त्याचा अर्थही खूप गहन व ज्याचा त्याने  लावायचा.  याला तबल्याची व संवादिनीची अप्रतिम साथ मिळाली. सुंदर संवादिनी, धा  तीं ता डा  ता तीं ता डा चे तबल्याचे आक्रमक बोल, सुभाषकाकांनि दिलेली टाळेची साथ  याने बहार आणली.  हो मोहक चाल अपूर्वा गोखले यांनींच बांधली आहे.
या नंतर "जसोदा तेरो लाल" ही  भैरवीतील डॉ. सुचेता बिडकर यांची रचना मांडली  गेली.  भैरवी सुरु झाली  आणि आता मैफल संपणार या भावनेने थोडा खट्टू झालो.  उणीपुरी पाच मिनिटांची भैरवी झाली पण मनात अजुन घुमत आहे. खाली याच रचनेची लिंक देत आहे. १:०६:०२ वर पाहावी.





एकूणच मैफलीत दोहोंचा समन्वय दिसून आला. एकमेकिंना संधी देऊन गायन केले जात होते. कित्येक वेळा षटकाराचे चेंडू सहज दुस-याला देऊ केले जात होते. चिन्मय कोल्हटकर यांनी खूप तन्मयतेने पेटी वाजवली. अप्रतिम संगत. संजय देशपांडे यांनी १२०% देऊन परफॉर्मन्स  दिला. काही तांत्रिक कारणांनी तबल्याचा माईक बंद पडला. संयोजकांचा (म्हणजे मीच) ढिसाळ कारभार दुसरं काय :).  मुख्य म्हणजे ब-याच जणांना तबल्याचा माईक बंद आहे हे माहित नव्हत इतका तुफान तबला वाजवला गेला. हे होऊनही कलाकारांनी समजून घेतला यात त्यांचा मोठेपणा आहे.

मी प्रत्येक मौफलीचं कौतुकच करतो असे काही जणांना वाटेल.  ते  काही अंशी बरोबर पण आहे. या मैफली खरंच कौतुक करण्या सारख्या असतात.  यात फक्त कलाकाराचे कौतुक नसून पिढ्यानपिढ्या  चालत आलेल्या त्या संगीत परंपरेचा त्यांच्या गुरूंचा तो एक प्रकारे आदर आहे. पारंपारिक संगीत एक खळाळत येणारा पाण्याचा प्रवाह आहे अस मला वाटत. कलाकार त्या प्रवाहाला दिशा देणारा दगड ठरू शकतो. काही कलाकार आपला रंगही त्या पाण्यात मिसळतात.  असा प्रत्येक  कलाकार जो या प्रवाहाच्या वाटेत येऊन त्याचा डबकं करत नाही त्याच्या बद्दल मला  नितांत आदर आहे. असो.

भैरवी लवकर संपल्याची चुटपुट  श्रोत्यांना लागली.  अजुन तासभर गाणं ऐकायची तयारी सर्वांची होती. एका मैफलीने समाधान झाले नसल्याने पुन्हा एकदा डॅलसला मैफिलीचा योग घडावा या प्रतीक्षेत आहोत.

५ नोव्हेम्बर २०१६
गायिका:अपूर्वा  गोखले व पल्लवी जोशी
तबला: संजय देशपांडे 
संवादिनी: चिन्मय कोल्हटकर

(बंदिशीच्या शब्दामध्ये काही बदल अपेक्षित आहेत. ते झाले कि हा कंस उडवेन  )


राग श्री: वारी जाऊँ रे (विलंबित तिलवाडा)
वारी जाऊँ रे सावरिया 
तुमपे वारना रे तुमपे वारना रे ।
तन मन धन सब तुमपे वारूं
जान जिगर तुमपे ॥
 
राग श्री: एरी हुतो आस (द्रुत तीन  ताल )
एरी हुं तो आस न गैली पास न गैली
लोगवा धरे मैका नाम ।
जबतें पिया परदेस गवन किनो
तबतें देहरी न दीनो पाव ॥

राग तिलक कामोद:सूर संगत (मध्यलय रूपक )
सूर संगत राग विद्या 
संगीत प्रमान जो कंठ कर दिखाये 
वाको जाने गुनि ग्यानी ।
अणु द्रुत लघु गुरु प्लुत 
ताल मूल धर्म राखिये 
सुअंछर सुधबानी ग्यानी ॥

ता नुम  तनन (एकताल) 


राग गौड मल्हार: काहे हो (मध्यलय एकताल)
काहे हो हम सो प्रीतम 
आंखे फेर डारी ।
का मोपे चूक परी
सुधार ले हो सदारंग 
तुम पर वारी ॥

राग गौड मल्हार: सैंय्या मोरया रे (मध्यलय तीनताल )
सैंया मोरा रे मैं तो 
वारी वारी रे गरवा म्हारे डारे ।
एक हाथ मोरी भरी सुरैया 
ढीट लंगरवा तोरा 
ज्यो ज्यो री मन माने मोरा
त्यों त्यों देऊ प्रान मै तो वारी हारे ॥

निर्गुणी भजन: अवधू माया ताजी न जा (भजनी ठेका )
अवधू, माया तजी न जाई। गिरह तज के बिस्तर बॉंधा, बिस्तर तज के फेरी।। काम तजे तें क्रोध न जाई, क्रोध तजें तें लोभा। लोभ तजे अहँकार न जाई, मान-बड़ाई-सोभा।। मन बैरागी माया त्यागी, शब्द में सुरत समाई। कहैं कबीरा सुनो भाई साधो, यह गति बिरले पाई।।

राग भैरवी: जसोदा तेरो लाल (मध्यलय तीनताल )
जसोदा तेरो लाल देखो मनात नाही
फोरे मोरी गगरी, भिगोदी सारी चुनरी
धीट बनावारी करे बरजोरी ।
हारी हारी दैय्या पकर मोरी बैय्या
चारचा करे सब घर  के लुगैय्या 
जेठ जेठानी दोरनी सांस ननंदिया मोरी
कैसे सहे मुरारी देत सब गारी ।।
राखो मोरी लाज जाने दे घर काज
झगर ना करो मोसे बात मानले आज
लपट झपट कर बैंया मोरी मरोडी
रोको नाही डगरी गिरिवर धारी  ।।


Comments (2)

Keep it up .Nice one.

अप्रतिम वर्णन
संगीताची चांगली माहिती