नकार: थोडीशी पार्श्वभूमी व खुलासा

Category:


काल मिळालेल्या प्रतिक्रियेवरुन असं जाणवलं की थोडासा खुलासा करणं आवश्यक आहे. नेमका टोला कुठे लगवायचा होता किमान ते तरी सांगावं. हिंदुस्थानाने सामना हरल्यावर धोनी जसा वारंवार काही नाही कारणे देतो खरं म्हणजे त्याने काही होत नाही. गेलेला सामना गेलेलाच राहतो. काही जणांना थोडं बर वाटतं इतकंच. तद्वद कालच्या संवादाची थोडीशी पार्श्वभूमी मी सांगु इच्छितो:

संवाद गंभीर नसून उपरोधातून विनोद साधणारा होता.
हिंदुस्थानाबाहेर राहणा-या (मुख्यत्वे अमेरिकास्थित) अनिवासी भारतीय मुलांच्या लग्नाची आजकाल कशी गोची होवून राहिली आहे या परिस्थीतीवर थोडं फार काही तरी खुमासदार लिहायचा बेत होता. अमेरिकन मंदीवरच्या भरभरुन बातम्या सकाळ सारख्या वृत्तपत्रांनी छापून अमेरिकेतल्या मुलाचे स्थळ अगदी "डाउन मार्केट" करुन टाकले आहे. भारतातल्या मुली करिअरवर पाणी सोडून अमेरिकेत जायला तयार कशा नाहीत हे सांगण्यासाठी कालचा प्रपंच होता.

कालच्या संवादातील मुलगा अमेरिकेत राहत असल्याने तो त्याचा दोष असल्यागत भारतातल्या मुली तोंड फिरवत आहेत, ही सत्य परिस्थीती थोडी अतिरंजित करण्यासाठी संवादातला नायक, भारतात (म्हणजे पुण्यात) रहात असलेल्या मुलीबरोबर चॅटिंगवर संवाद साधतो व आपण बेंगलोर ला रहात असल्याचे खोटेच सांगातो. लग्न जमवण्यासाठी आता अमेरिकेतल्या मुलांना "मी भारतातच राहतो" असे खोटेच सांगावे लागते की काय या वात्रट कल्पनेने कालचा संवाद लिहिला गेला होता.

वास्तविक संवादातून हळूहळू वाचकासमोर परिस्थीती उलगडायला हवी होती. हे कसब अजून अंगी आले नाही हे जाणवले. पुढच्या वेळेला आणखी प्रयत्न करीन. धन्यावाद.

कालचा संवाद येथे वाचता येईल.



नकार

Category:

कन्या: (तावातावाने) तू मला असं फसवशील असं वाटलं नव्हतं !
मुलगा: अगं असं का समजतेस? मी तुला कुठे फसवतोय?
कन्या: इतकं मोठं सत्य तू माझ्या पासून लपवून ठेवलंस?
मुलगा: अगं मी तुला गमावून बसेन अशी भीती होती म्हणून....
कन्या: म्हणून तू खोटं बोललास?
मुलगा: अगं खोटं नाही बोललो फक्त खरं थोडंसं लपवलं.
कन्या: पण आता ते सत्य सांगितल्याने तू मला गमावणार नाहीस असं वाटतं का तुला?
मुलगा: प्रेम अंधळं असतं मधु..
कन्या: लाडात यायचं काम नाही. माझी एवढी फसगत झाली आहे. यातून काय मार्ग काढायचा ते माझं मला ठरवू दे.
मुलगा: अगं असं काय एवढं आभाळ कोसळल्या सारखी बोलतेस. फक्त एवढीशी तर गोष्ट आहे.
कन्या: फक्त? तुझ्या साठी असेल फक्त. मला तर अगदी कुठे येऊन अडकले असं झालंय?
मुलगा: हेच का तुझं प्रेम? एवढ्यात बदललीस?
कन्या: हो. तू तरी कुठे खरा वागलास? का मला फसवलंस बेंगलोर ला असतोस म्हणून? तरीही माझ्या मैत्रीणी, "बेंगलोर ला आहे तो १०० वेळा विचार कर" म्हणत होत्या.
पण मीच म्हटलं एवढं सगळं जुळून येतंय आपलं माणूस थोडंसं चुकणारच. बेंगलोर तर बेंगलोर. फार फार तर एक दोन वर्षात पुण्या मुंबईला नोकरी शोधता येईल.
मुलगा: अगं मग तसंही मी सध्या पुण्या मुंबईला यायला तयार आहे की दोन तीन वर्षांनी
कन्या: ते काही नाही तू मला फसवलंयस. ज्या नात्याची सुरुवात फसवाफसवीने होते ते नातंच मला नको. (हाताची घडी घालून मुलाकडे पाठ फिरवत)
मुलगा: अगं माझं ऐकून तरी घेशील..
कन्या: काही ऐकायचं नाहीए. तुझा आणि माझा मार्ग वेगळा समज.
मुलगा: मधु असं का टोकाला जातेस. मला समजून घेण्याचा प्रयत्न कर.
कन्या: परक्या लोकांनी मला एकेरी आणि लाडाची संबोधनं लावलेली मला आवडत नाहीत.
मुलगा: अगं मी क्षणात परका झालो तुझ्यासाठी? ४ महिने आपण चॅटिंग करत होतो ना?
कन्या: तोच मूर्खपणा झाला.
मुलगा: अगं पण ठरल्याप्रमाणे आलो ना मी तुला प्रत्यक्षात भेटायला?
कन्या: उपकारच केलेस जणू !
मुलगा: माझ्या दिसण्यात उंचीत, रंगात काही प्रॉब्लेम आहे का?
कन्या: नाही रे. तोच तर वांदा करुन ठेवलास तू. तसा काही प्रॉब्लेम असता तर मी इथे हा वाद घालत उभी नसते.
मुलगा: मग अडचण तरी काय आहे?
कन्या: तुझं काय जातं रे "अडचण काय आहे" म्हणायला. माझ्याशी इतकं खोटं वागलास तू? मला तुझं तोंडही पहायचं नाही.
मुलगा: ठीक आहे. तुला एवढाच जर त्रास होणार असेल तर नको जाऊया आपण पुढे. पण माझ्या समोर दुसरा कोणताच मार्ग शिल्लक नव्हता.
कन्या: मला इमोशनली अडकवून नंतर खरं सांगून फसवायचा डाव होता ना तुझा?
मुलगा: (चिडून) हो होता. आता मुलगी मिळत नाही म्हटल्यावर मला हाच डाव खेळावा लागला.
कन्या: मीच सापडले का रे तुला? मी एकुलती एक. इथे चांगल्या एमएनसीत मॅनेजर. चार लोक मला रिपोर्ट करतात. तिकडे आल्यावर माझ्या करिअरचं काय? एवढी मेहनत घेतेय करिअर साठी त्यावर पाणी सोडू?
मुलगा: मग करिअर महत्त्चाचे की लग्न तूच ठरव.
कन्या: ठरवायचंय काय त्यात? करिअर सांभाळून लग्न करता येतं म्हटलं ! तुझ्या सारखे ५६ प्रोग्रामर इथे वाट पाहत आहेत माझ्या एका इशा-याची.
मुलगा: तुमचे दिवस आले आहेत ना. करा माज.
कन्या: हो करणार. तुम्ही नाहीत का केलेतइतके दिवस स्त्रियांवर अत्याचार? आता जरा आमच्या बाजुने वारा वाहिला की यांना जड जातं.
मुलगा: आमच्या दृष्टीने जरा विचार कर.
कन्या: अरे तुम्ही केला का कधी आमचा विचार? जा जा. यूएस चा रस्ता सुधार. आलाय मोठा खोटारडा. म्हणे बेंगलोरला असतो. जा तिकडे तुमच्या अमेरिकेत शोधा पोरगी, मिळते का पहा.
मुलगा: (नि:शब्द होवून पुणे मुंबई एसी वोल्वोच्या तिकीटाची चौकशी करायला जातो)



* पात्र, त्यांची नावे व प्रसंग पूर्णत: काल्पनिक, हा संवाद नीटसा कळला नसेल तर खुलासा येथे वाचता येईल.

चला दोस्तहो मत्कुणांवर बोलु काही ! (अध्याय २ -अंतिम)

Category:


अध्याय १- येथे वाचा.


आमच्या घरात मत्कुणांचा उत्पात झाला होता या संकटविमोचनासाठी मत्कुणोपद्रवनिवारक कंपनीला आम्ही पाचारण केले. त्यांनी “गर्भार महिलेसाठी घ्यावयाच्या काळाज्या” छाप सूचना एका कागदावर लिहुन अम्हाला दिल्या.


घरातले सगळेच्या सगळे कपडे धुवायला सांगितले. कंपनीवाला कोकणस्थ असता तर "लंगोटी सुद्धा शिल्लक ठेवूं नका बरे!" असं सुद्धा सांगितलं असत. बुधवार पर्यंत सगळे कपडे धुवून ४० मिनिटे ड्रायर मध्ये सुकवून प्लॅस्टिकच्या थैल्यांमध्ये सील करुन ठेवा, असा आदेश (बांदेकर नव्हे !) आम्हाला त्यांनी दिला. त्यानंतर ते संपूर्ण घरात फवारणी करणार व मत्कुणाचा नायनाट होणार होता. पण एवढं सगळं करुन चुकुनही एक जरी आनंदी जोडपं त्यातून सुटलं तरी नवी मिलिट्री उभी करायला त्यांना फारसा वेळ लागत नाही. गोष्ट सिरिअस होती. आम्ही सुद्धा "मत्कुणाचे उच्चाटन केल्या शिवाय केसांना जेल लावणार नाही !" असे प्रतिज्ञा केली असल्याने पेटलो होतो.


मंगळावारी संध्याकाळी ऑफिसातून आल्यानंतर कार्यारंभ जाहला. सगळे कपडे चादरी, जॅकेट्स गोळा केले. एक चिरगुटही शिल्लक ठेवले नाही. जपानी ट्रेन मध्ये तिथेल पोलीस जशी माणसे कोंबतात तसे कपडे मिळतील त्या बॉक्स मधे बॅग मध्ये कोंबले. आमचा एक रुम पार्टनर घरी नसल्याने त्याचे सर्व कपडे आम्हलाच पॅक करणे भाग होते. घरात एक मोठा बॉक्स होता. त्यात त्याचे सगळे कपडे बसवले. वर चार वेळा नाचलो. (तो माझा ब्लॉग वाचत नाही त्यामुळे भ्यायचा प्रश्न नाही !) प्रश्न उरला होता तो सुटांचा. सूट साध्या लॉडरी मशीन मध्ये टाकता येण्या सारखे नव्हते. हा एक फार डोक्याला ताप झाला होता. सूटाची अगदी सासुरवाडी सारखी गत असते. कामाला कधी तरीच येणार पण सांभाळणेच जास्त ! अनुभवाशिवाय लिहितोय पण, “विष खाल्ल्यावर माणूस यमसदनी जातो” ही काही स्वत: केल्याशिवाय कळत नाही अशी गोष्ट नव्हे. डोळे उघडे ठेवून जगणा-या कोणत्याही सुजाण व्यक्तीस हे सत्य सहज उमगेल. सुटाचा प्रश्न जास्त गहन होता. महिन्याला एक दोन फोन बाबांच्या तब्येतीची चौकशी एवढ्यावर ते प्रकरण सुटणारं नव्हतं. सुटांच्या ड्राय क्लिनिंग साठी आख्खे ३० डॉलर खर्च होणार होते. एवढ्या पैशात देशात नव्या सुटाची शिलाई सुटली असती. सूट कव्हर फाडून आत घुसून अंडे देण्याची ढेकणाची एवढी प्रबळ इच्छा होईल असे वाटत नव्हते. म्हणून आम्ही सूट धुवायचा कार्यक्रम बस्तानात व सूट ट्रॅशबॅगमध्ये गुंडाळून ठेवला. कपड्यांच्या गठ्ठ्यांचे धूड वाहून नेताना भिजलेला कापूस वाहून नेणा-या गोष्टीतल्या गर्धभासारखी अवस्था झाली होती. कार पर्यंत कसे बसे ओझे वाहून नेले. कपड्यांचा एक मोठा बॉक्स आम्ही दोघे (दोघे म्हणजे रुममेट आणि मी) मिळून उचलून नेताना, शेजारीपाजारी बघायला लागले. समोरच्या बाल्कनीत पण मंडळी जमा झाली. काही जण तर आपण क्राईम सीन चे साक्षीदार झालो आहोत अशी मुद्रा घेऊन आमच्या कडे संशयाने बघायला लागले.


आम्ही चहु बाजुने दगड खाणा-या लैलेचे स्मरण केले व आपलि परिस्थीती एवढी काही वाईट नाही अशी समजुत घालून कामाला लागलो. कार सुरु केली व अपार्टेमंटच्या लॉंडरी रुम पर्यंत आणली. सर्वात जड गठोडे आधी हातावेगळे करावा म्हणून ते उचलले. धापा टाकीत दारापाशी पोचलो तर दारावर काही तरी चिठोर चिकटवले होते. उद्या पहायला पाहुणे येणार आणि आज चेह-यावर मुरमाचा फोड उगवावा अशा तरुणी सारखं, “हे आजच व्हायचं होतं का?” हा आगतिक प्रश्न आम्ही तितक्याच क्लेषाने उच्चरला. कारण दारावरचा संदेशच तसा होता,

Sorry for the Inconvenience but the Laundry will be closed till Friday


आमचे फवारणी वाले फवारणी करायला उद्या येणार होते आणि आम्ही हतबलपणे कपड्यांचे गाठोडे घेउन लॉंड्री पाशी उभे होतो. फावरणी कार्यक्रम पुढे ढकलावा तर एवढे सगळे गाठोडे पुन्हा घरापर्यंत न्यायची आणि शनवारी ते पुन्हा आणायची कसरत करावी लागणार होती. शिवाय विकेन्डचा व ३ रात्रींच्या झोपेचा चुराडा होणार हे दिसु लागले. मग पर्यायाची शोधाशोध सुरु झाली. शेवटी दुस-या एका मित्राच्या अपार्टमेंट मधली लॉंड्री वापरण्याचा निर्णय घेतला. लॉंड्री रुमची चावी मागण्यासाठी त्याला कॉल केला. तो बाहेर गेला होता. पण सुदैवाने लवकर परत आला. व जास्त वेळ न ताटकळता आम्ही चावी हस्तगत केली. स्मार्ट कार्ड २०$ ने चार्ज केले. व आम्ही शूर शिपाई युद्धावर निघालो. एक एक मशिन भरता भरता नाकी नउ आले होते ! आमच्या कडे एवढे कपडे असतील असे वाटले नव्हते कारण एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल १५ लॉंडरी मशिन्स भरल्या. एवढं करुनही काही कपडे उरलेच होते. मग त्यांची कोंबाकोंबी केली. त्या रात्री त्या लॉंड्रीचे आम्ही सम्राट होतो. आम्ही एकही मशिन रिकामी ठेवली नव्हती. हे सगळी सेटिंग करे पर्यंत ९ वाजले होते. जेवणाच्या नवाने बोंब होती. एका मित्राला फोन करुन जबरदस्तीच “आम्ही आज तुमच्या कडे जेवायला येत आहोत बरं का !” असं लाडिकपणे सांगितलं. रणांगणात कपडे तसेच टाकून आम्ही जेवण्यास गेलो. जेवून परत आलो. आता कपडे सुकवण्याचे काम करायचे होते. ड्रायरचे एक चक्र एक तास चालते. त्यात वाळले तर नशीब नाही तर आणखी एक चक्र. १५ ड्रायर्स मिळणे अशक्यप्राय होते. जेमतेम ६ ड्रायर उपलब्ध होते. याचा अर्थ अम्हाला उशीर होणार आणि सगळं वेळेचं गणित बोंबलणार हे दिसायला लागलं होतं. शेवटी जमेल तेवढे कपडे कोंबायला सुरुवात केली. एक ड्रायर रिकामे झाले की त्यात दुसरे कपडे लावायचे. एक संपले की दुसरे आणि दुसरे संपले की तिसरे. ड्रायिंगच्या या चक्राचे चक्रव्यूह सांभाळता सांभाळता आमचा अभिमन्यू झाला होता. एक. रात्रीचे ११ वाजले आणि एवढ्या मेहनतीचं फळ होतं: अर्धे कपडे अर्धवट वाळलेले व अर्धे कपडे रामाच्या मळक्या गंगेच्या नायिके प्रमाणे चिंब ओले !


हे कमी होते की काय म्हणून आणखी एक सर्प्राईझ आमच्या साठी ठेवले होते, कपडे ड्रायरमध्ये टाकताना लॉंड्री मशिनने काय रक्तपात केला होता ते दिसायला लागले. माझे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल पाच नवे फेवरेट टि शर्ट्स डागाळले गेले. कित्येक कपडे तिथेच फेकून द्यावे लागले. पांढ-या कपड्यांनी प्रेमात पडल्याप्रमाणे गुलाबी रंग धारण केला होता. त्यातून आमची गांधी टोपी ही सुटू शकली नाही. ती गुलाबी झाल्याने घालायची सोय राहिली नव्हती. (गुलाबी हा रंग गांधी या व्यक्तिमत्वाला शोभला असता पण टोपीला नव्हे !)


५-६ शर्ट युद्धात कामी आले तरी अंतिम विजयासाठी आम्ही लढाई सुरुच ठेवली. पाहता पाहता रात्रीचे १२ वाजले. आमच्या आशा ज्या ड्रायिंवर चक्रावर अवलंबून होत्या त्याने दगा दिला होता. कपडे अर्धवट ओले राहिले होते. त्यामुळे आणखी एक चक्र लावावे व उद्या दुपारी येवून कपडे घेवून जावे असे ठरले. मिशन अर्धवट सोडून सर्व ड्रायर लावून आम्ही घरी परतलो. दुसर-या दिवशी जाउन कपडे घ्यायचा प्लान होता. त्यानुसार तेथे पोचलो तर तिथे वेगळाच गहजब सुरु होता. सगळे ड्रायर अडवले म्हणून लोक तक्रारी करायला लागले होते. कोणाचे आहेत एवढे कपडे असे विचारु लागले. मित्राच्या बाईकवर मागे बसून फिरताना अनपेक्षितपणे पिताश्री समोर यावेत अशा कन्ये प्रमाणे आम्ही अगदी शरमेने मान खाली घालून तिथून कपडे आवरुन काढता पाय घेतला. कहर म्हणजे रात्रीच्या एक्स्ट्रा ड्रायिंग सायकल नंतरही कपडे ओलोच राहिले होते. पण तिथे जास्तवेळ थांबण्यात रिस्क होती. उगाच ऑफिस मध्ये तक्रार गेली तर मित्र गोत्यात यायचा. म्हणून कपडे असेच गोळा करुन आम्ही निघालो.आता पर्यंत तब्बल ४० $ चा चुराडा झाला होता.


इकडे घरात फवारणी झाली होती. व शत्रुचा नि:पात झाला होता. पण रिस्क नको म्हणून कपड्यांचे बोचके कार मध्येच ठेवले होते. व्हायचे तेच झाले. सर्व कपड्यांनी विचित्र दर्प धारण केला. आणखी एकदा धुतल्याशिवाय तो जाणार नव्हता. त्यामुळे आणखॊ ४०$ चे चंदन लागणार हे पाहून मनाला यातना झाल्या. २४ तास कार मध्ये राहिलेले कपडे आम्ही तीनमजले चढून घरात आणले. आणि वाळवण्यासाठी गॅलरी मध्ये पसरवून ठेवले. ही लॉंड्री किती महागात पडली ते हळूहळू कळायला लागले होते. घालण्यासाठी म्हणून जो जो शर्ट काढत होतो तो तो आकसून गेल्यामुळे किंवा डिटर्जंट चे किंवा रंग सुटल्याचे डाग लागल्यामुळे अशा काही न काही कारणामुळे घालायच्या लायकिचा राहिला नव्हता.


एक एक वीर रणांगणात पडत असताना रावणाची काय तगमग झाली असेल ते आम्हाला समजले. फरक एवढाच होता की तिथे शत्रूपक्षी वानरसेना होती व इथे मत्कुणसेना. पण आम्ही कुणा गो-या सीतेचे अपहरण केले नव्हते ! माझ्या मते सीता व जटायू वेडेच होते. सरळ सरळ ९११ ला कॉल करायचा सोडून उगीच आरडाओरडा करत बसले. जटायूला तर फुकट प्राण गमवावे लागले. असो विषयांतर नको ! लंकेत कुठलं आलंय ९११ असं म्हणून तुम्ही माझा पोपट कराल ! पोपाट झाल्याने नाविलजाने माझ्यावर कदचित महाराष्ट्राच्या एका प्रसिद्ध सेनेच्या कार्याध्यक्षपद पदाचा भार पडेल. मग मला शेतक-यांचे प्रश्न समजतात वगैरे असा आव आणावा लागेल, त्या पेक्षा इथेच थांबलेले बरे.


तर आमची एवढी सगळी वाताहत ४ मत्कुणांमुळे झाली. कपड्यांची नासधूस कमी होती की काय आम्ही सगळ्या रजया (कंफर्टर्स) , उश्या फेकून दिल्या ! आतंकवादाचा पूर्ण खात्मा झाल्या शिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही अशा भारत सरकारच्या रोज बदलणा-या मिळमिळित खाक्याचा अवलंब न करता खरोखरीच ढेकणांचा खात्मा झाल्या शिवाय नवे बिछाने घेणार नाही अशी ठाम भूमिका आम्ही घेतली. त्यामुळे दररात्री कोचावर झोपावे लागत होते.


विधिस्तु कमले शेते हरि: शते महोदधौ हरो हिमालये शेते मन्ये मत्कुण शंकया।।

पुढे मागे या जुन्या सुभाषिता मध्ये “मन्ये मत्कुण शंकया” च्या आधी कोणी तरी “काउचे शेते अभि:” हे तीन शब्द चिकटवेल व आम्ही श्लोक रुपाने तरी अजरामर होवू असे वाटल्याने काउचवर झोपायचे फारसे दु:ख नव्हते !

तदनंतर नवरात्र आल्याने कोच सोडून आम्ही कार्पेट्वर आलो. हे म्हणजे खुद्द बुश ने अफगाणिस्तानात मुकाम ठोकल्यासारखे होते. पण अतिरेक्यांचा खात्मा झाला आहे की नाही ही परीक्षा घेण्यासाठी स्वत:ला असं सावज म्हणून ठेवणं भाग होतं. एवढ्या मेहनतीचा निकाल चांगला दिसत होता. त्यांच्या अस्तित्त्वाच्या काही खुणा दिसत नव्हत्या. त्यामुळे जरा हायसं वाटत होतं. पण पलटवार केव्हाही होवू शकतो म्हणून आम्ही सदैव जागरुक होतो. कुणीही सांगितलं नाही तरी अधून मधून अमेरिका इराण इराकच्या बायो मेडिकल शस्त्रांची तपासणी करते तसं मी घरातला कोपरान कोपरा धुंडाळु लागलो. टिव्ही पाहत असताना अचानक उठून काउचला उलटं पालटं करण्याला आम्ही गनिमी कावा समजू लागलो होतो. माझ्या रुममेटला तर मला आता मानसोपचाराची गरज आहे असे वाटायला लागले होते.


पण एवढा मोठा आर्थिक फटका, आवडत्या कपड्यांची नासाडी, प्रचंड अंगमेहनत, एक महिना निद्रानाश व एवढा मनस्ताप होवूनही मनस्थिती चांगली होती ते केवळ विजयाच्या आनंदा मुळे! ढेकाणांना आम्ही माफ केलं होतं.

अंतिम परीक्षणासाठी फावरणी कंपनीला पाचारण केले व त्यांनी घराची शुद्धी झाल्याचा निर्वाळा दिला व आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला. पेलिओन्टॉल्लॉजिस्ट जसे जगभर डायनोसॉर शोधत उत्खनन करत फिरतात तसंच आम्ही एक दिवस सहज कुतुहल म्हणून काउच चेक केला. मंगोलियाच्या गोबी वाळवंटात अमेरिकन संशोधकांना डायनोसोर ची अंडी सापडल्यावर जेवढा आनंद झाला असेल तेवढाच संताप आम्हाला मत्कुणाची अंडी सपडल्याने झाला. मरावे परी अंडीरूपे उरावे असे ढेकणांचे ब्रीद सार्थकी करत मरता मरता अनेक अंडी देउन गेले होते. एक दोन मिनिटातच राग गेला. आणि अचानक मी व माझा रुममेट कार्पेवर पडून गडबडा लोळून हसायला. राग यायच्या ऐवजी आमची केवढी घनघोर थट्टा झाली याचे हसू आम्हाला आवरले नाही !


४५ दिवसात नवे पाहुणे बाहेर अल्यावर त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमला कॉंग्रेसचे नेते राष्ट्रवादीच्या सभेला जसे अनुपस्थित राहतात तसं नुपस्थित कसं राहता येईल याचा विचार मी करु लागलो.


मारामारी, खून, विषारी द्रव्य फवारणे असं काही केल्याने प्रश्न सुटत नाहीत उलट ते अधिक गहन होता, हे आम्हाला उमगले. ”कुत्रा” हायर करुन मत्कुणांना शोधणे किंवा आणखी एकदा परंपरागत युद्ध छेडणे हे पर्यात होते.

पण एखाद्या मुत्सद्दी राजकाणा-या प्रमाणे आम्ही आउट ऑफ द बॉक्स विचार करुन सांमजस्याने नमते घेण्याचे ठरवले. पराभव तर मान्य होताच प्रश्न होता नामुष्किचा. शेवटी ढेकणांच्या येणा-या नव्यापिढीला व आम्हाला दोघांनाही गृहसौख्य लाभावे म्हणून आम्ही जुन्या वास्तुतून काढता पाय घेउन नव्या ठिकाणी घरोबा केला. आम्ही जित झालो होतो पण चतुर इंग्रजी इतिहासकारांप्रमाणे यास पराभव न संबोधता त्यास “कोव्ह अपार्टमेंटची यशस्वी माघार” असे नामाभिदान देउन आम्ही मोकळे झालो.


आता ते रात्रीचे अलार्म नाहीत, छापे टाकणे नाही, दचकून उठणे नाही, रात्र रात्र जागरण नाही, लॉंड्री कधीही केली तरी प्रॉब्लेम नाही, आर्थिक फटका नाही, कसलंच टेंशन नाही. सगळी वैतागवाडी संपली. पण आता मला चुकल्या चुकल्या सारखं वाटायला लागलंय. एवढं सुखी शांत आयुष्य जगायची सवय नाही ना ! त्यामुळे लवकरच लग्न करीन म्हणतो !!!


.

चला दोस्तहो मत्कुणांवर बोलु काही ! (अध्याय १)

Category:

सकाळच्या पाचाला फोन खणाणला. भारतातले मित्रच ते अवेळी फोन करायचेच ! त्याचं आता फारसं काही वाटत नव्हतं, पण तरीही सकाळची झोपमोड झाल्यामुळे विशेष कारण नसणा-याने फुलटू शिव्या खाल्ल्या असत्या. फोन उचलला तिकडून रंग्या किंचाळलाअबे अभ्या ऊठ एक न्यूज आहे!”, आजकाल रंग्याच्या न्यूज मध्ये काही दम राहिला नव्हता म्हणून मी त्याला लाईट घेतलं, तो जेवढा जास्त एक्साईट होतो तेवढी बकवास न्यूज असणार हे माहित होतं. तरी डोळे चोळत बेड मध्ये उठून बसलो आणि पाहतो तर काय, रात्रीची शिफ्ट संपवून घरी परतणारी बिपीओ मधली पोरं जशी बाईक उंडारतात त्याच गतीनेसाहेबघाई घाईत घराकडे निघाले होते. त्यांना पाहून आमची पाचावर धरण बसली. रंग्याला सांगितलंतुझी न्यूज गेली खड्ड्यात इथे माझ्या पोटात खड्डा पडायचीवेळ आली आहे! नंतर फोन करतोउत्तराची अपेक्षा करता फोन बंद केला आणि साहेबां कडे जरा लक्ष दिलं. साहेब जरा ओळखीचे वाटत होते. मागे एकदा फार फार वर्षांपूर्वी गाठ पडली होती. ती कटू आठवण आठवून मनातमी प्रार्थना सुरु केली की हे साहेब ते जुने साहेब नसावेत! पण दैवदुर्विलासाने आमचे साहेब जुने साहेबच निघाले ! किचन मध्ये पळत जाउन एक टिश्यू आणला. साहेबांना त्यात उचललं. गॅलरित नेवून कागद पेटवून अगदीआगतिक मनाने साहेबांचे अंत्यसंस्कार केले. आपण कोणत्या संकटात सापडलो आहोत आणि पुढे काय कायवाढून ठेवले आहे याचा विचार करायला लागलो. एवढ्या सुंदर आपार्ट्मेंट मध्ये हे असे काही घडेल असेल वाटले नव्हते.


एकूण विषयाचं गांभीर्य अनुभवी वाचकांच्या ध्यानात आलं असेल. आमचेसाहेबम्हणजे आद्य घड्याळजी नव्हेतर सर्वजनांत अप्रिय कीटकरक्त्बीजऊर्फमत्कुणऊर्फखटमलऊर्फढेकूणहोत ! ढेकणावर कोणी कधीलेख लिहितं का? असं तुम्हाला वाटलं असेल. राईट बंधुंनाहीमाणूस कधी उडू शकतो का?” असं म्हणून लोकांनी वेड्यात काढलं होतं ! म्हणून संकुचित मनोवृत्तीच्या लोकांकडे दुलर्क्ष करीत आम्ही जिद्दीने हा विषय येथे मांडणार आहोत. लोक कुत्र्यावर, मांजरावर, पोपटावर, हॅमस्टरवर, उंदरावर अगदी कहर म्हणजे बायकोवरही लिहितात मग ढेकणाने कोणाचे घोडे मारले आहे? शिवाय हा आंतरराष्ट्रीय प्रश्न असल्याने यावर सखोल विवेचन होणे आवश्यक आहे असे आमचे मत आहे. ज्यांना शीssss इय्यूsss याकssss !!” या पैकी काही वाटत असेल त्यांनी आल्या मार्गी बॅक बटन दाबुन परत जावे!


प्रश्न गंभीर होता पण उपाययोजना करणे तेवढेच आवश्यक होते. प्राथमिक धक्क्यातून बाहेर आलो. बेड रुम मध्ये शिरलो! एकेका गनिमाला शोधायचे ठरवले. आता आमच्या अंगी बुश संचारला होता. लादेनसाठी बुशने अफगाणिस्तानाला कसा त्राही त्राही करुन सोडला होता तसा आम्ही आमच्या बेडरुमचा अफगाणिस्तान करुन सोडला होता. अचानक छापा टाकाण्याचं तंत्र सुरुवातीला चांगलंच यशस्वी झालं चार पाच निद्रिस्त गाफिल गनिम एकाच ठिकाणी गावले. विलास (राव नव्हे !) हे विनाशाचे कारण आहे याची प्रचीती आली. त्या प्रणयी मत्कुणांना तशी प्रचीती येण्याच्या अवस्थेत ते नव्हते. ६० च्या दशाकात अमेरिकेत मनुष्य जातीत अशी स्नेहसम्मेलने होत असत. (शहाण्यांना वरुन ताकभात लक्षात आला असेलच!)


आमच्यावर हल्ला झाला आमच्यावर हलला झाला अशी बोंब ठोकत बुश जगभर सुटला तसे आम्ही गुगलवर बोंबलत सुटलो. एवढे गुगल केले तरीही ढेकणांना आवरावे कसे हे बिंग काही फुटले नाही! (बिल महाराष्ट्रात जन्मला असता तर लोकांची बिंगे फोडणारी प्रॉडक्ट्स बाजारत आणतो म्हणून त्याला मराठी मिडियाने चावट ठरवला असता ! असो.) मी नेट्वर मिळतील ते रिसर्च पेपर्स आर्टिकल्स वाचत सुटलो.


डिटीपी ने १९६० च्या काळात अमेरिकेत मत्कुण मरायचे हे कळाल्या नंतर ६०च्या दशकात अमेरिकेत नसल्याचा खेद वाटायला लावणारे अजुन एक कारण वाढले ! डिटीपी पचवायला शिकुन हे जीव अमेरिकेत आंध्रजनांप्रमाणेहळूहळू सर्वदूर पसरले. अगदी क्वचितच अगदी कळकट ठिकाणी वाढणारे हे अगदी पॉश पॉश घरात पण वाढु लागले. थोडक्यात काय तर त्यांचे रहणीमान सुधारले. त्यांची एवढी प्रगती झाली असेल असे वाटले नव्हते. गुगलायन केल्याने -याच गोष्टी कळाल्या, एक वर्ष खायला नाही मिळाले तरी हे व्यवस्थित जगु शकतात. आमच्या राजकारण्यांना सांगा कुणी तरी हे जरा !


अब बस एक ही बात, संपूर्ण स्वराज:

.मो.. गांधीं प्रमाणे आम्ही एकच ध्येय घेउन कामाला लागलो. (आज काल नुसतं गांधी म्हणून भागत नाही.कोणते गांधी ते सांगावं लागतं.नाही तर बीजेपी कॉंग्रेस दोघांनाही वाटायचं की त्यांच्याकडे बोट दाखवतोय.) मो.कंच फक्त ब्रीदच तेवढं घेतलं. "अहिंसा" हे तत्त्व घेतलं नाही ते बरं. मला चावून चावून एक दिवस आत्मसाक्षात्कार होवून ढेकूण स्वत:हून घर सोडून निघून गेले असते अशी सुतराम शक्यता नव्हती! त्यामुळे हिंसा अपरिहार्य होती. भारताने रशियाकडून शस्त्रास्त्रे मागवावीत त्या प्रमाणे आम्ही कम्युनिटी (एक संघ पणा कमी असल्याने, कम+युनिटी असा या शब्दाचा संधिविग्रह असु शकतो !) मालकांकडून मदत घ्यायची ठरवली. मालकांनी इन्स्पेक्शन करण्यास एक दूत धाडिला. शाळा तपासणी साठी इंस्पेक्टर यावा आणि पोरं गोंधळ करताना सापडावीत अगदी तसं झालं. तपासणीसाहेब आले आणि चक्क दिवसा ढवळ्या सहलीवर निघालेले दोनगनीम सापडले. त्यामुळे लगेचच एस्टिमेट्सचा आकडा मनातल्या मनात वाढवला असणार. तपासणी साहेबांनी अहवाल चाळमालकांकडे जमा केला. दुस-या दिवशी चाळामालक ट्रीट्मेंट करावीच लागेल म्हणाले. च्यायला ट्रीटमेंट करायला काही हरकत नव्हती पण त्यांनी जो आकडा सांगितला तो ऐकून आमचा बजेट प्लानच वाकडा झाला. ४२५ डॉलर्स !!!! म्हणजे ढेकणं मारायचे तब्बल २१००० रुपये !!! आमच्या घरात साधारण १० असतील. तर सरासरी एका गृहस्थाला घराबाहेर काढण्यासाठी २१०० रुपये?? च्यामारी आम्हाला घराबाहेर होण्यासाठी कुणीकधी पैसे नाही दिले. केवळ एकदा नवीनच लग्न झालेल्या मावस भावाने प्रायव्हसी मिळावी म्हणून मला घराबाहेर पिटाळण्यासाठी २० रुपये दिल्याचं आठवतं. आमचं तशी काही सिच्युएशन नसताना आम्ही ह्या साहेबांना घराबाहेर जाण्यासाठी २१००० रुपये??


घरात फावारणी होईपर्यंत तीन रात्री काढायच्या होत्या. त्या पण शत्रूचा फौज फाटा दांडगा असताना ! आम्ही गनिमी गनिमी कावा अवलंबायचा ठरवला. रात्री एक दीड अडीच चे अलार्म लावून झोपायचे अचानक छापा मारायचा. एक दोन वेळा वगळाता प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. झोपेचा मात्र बट्ट्याबोळ झाला होता. आमची अवस्था ख-यांच्या खालील कवितेतल्या पहिल्या "मी" सारखी झाली होती ! खरे प्रेम्यांची माफी मागुन चार ओळी खरडतो. (यात खरे आलेच हे एक गृहितक !)


मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो

तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो ।


मी जुनाट दारापरी किरकिरा, बंदी

तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी

मी बेड त्यजुनी काउचवर जाउनी बसतो

तो लंघून चौकट काउचावर याया बघतो ।


डोळ्यांत माझिया सूर्याहून संताप

दिसतात त्वचेवर चाव्यांचे मोजूनी, माप !

आमुचेच रक्त हे पिवुनी तो

घडवून लेकुरे रजईवरती झुलतो !!


मी पायी डसल्या ढेकणांवरती चिडतो

तो त्याच घेऊनी अंडी मांडून बसतो

मी डाव रडीचा खात बेगॉन मारतो अंती

तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने मरतो !


आमच्या घरातली ढेकणं मेली की तगली?, ट्रिटमेंट्साठी काय काय आटापिटा करावा लागला? प्रकरणआटोपले की कॉंग्रेसच्यागरिबी हटावघोषणे सारखे अनंतकाळासाठी लांबले? हे सर्व पुढच्या भागात !

अध्याय २ येथे वाचा.