4:06 PM
Posted by
निल्या
निलेश चा फोन आला आणि तो म्हणाला "अब्बे,ब्रेकिंग न्यूज". मी म्हटलं काय झालं बाबा आता? नाहीतरी पोल्ट्री मध्ये एका कोंबडीने मान टाकली की इतर सगळ्या कोंबड्या पटापट माना टाकतात त्याच गतीने आमचे मित्र कसली तरी लागण झाल्या प्रमाणे पटापट "कमिट" होत होते. मला वाटलं आता आणि कोण गेलं??...मनात पटकन उरलेल्या मित्रांचे चेहरे येवोनी गेले. पण त्यातल्या कुणा नराचे (पर्यायने नगाचे) अफेअर होईलसे असे कोणी शिल्लक नव्हते. मग मीच धीर न धरवल्याने विचारलं पटकन सांग बाबा कोणाचं ठरलं?
तो म्हणाला "अबे ठरलं नाही कोणाचं." मी म्हटलं मग? तसा तो म्हणाला "दिवा चा ऍक्सिडेंट झालाय !" मी जरा आश्चर्य चकित झालो आणि थोडा बेफिकिरही. कारण दिवाचा कसा काय ऍक्सिडेंट होणार? शक्यच नव्हतं ते. मला वाटलं खरचटलं बिरचटलं असेल. पण निलेश म्हणाला पायाचं हाड तुटलंय! रॉड टाकलाय. मग मात्र मी ते कसं शक्य असेल याचा विचार करु लागलो.
दिवा म्हणजे आमचा मित्र दिवाळकर. त्याचं नाव आम्ही दिवा ठेवलं होतं. अशाच शॉर्टफॉर्म्स चा एक किस्सा म्हणजे मी इंडियाला गेल्यावर कोणाला कधी भेट्णार आहे याचं वेळापत्रक बनवलं होतं.त्यात मी Nov 17th-Mala असं लिहून ठेवलं होतं. आमच्या मोठ्या बंधुराजांना आणि मित्रांना ती फाईल पाठवली. लोकांना माला कोण हा प्रश्न पडला. साल्याने कुठे सूत तर जुळवले नाही ना असे मित्र बोलू लागले. लाभले भाग्य आम्हास न ते..हे आमचे मित्र काही समजून घ्यायला तयार नव्हते. आमचा खुलासा Mala म्हणजे माझा इंजिनिअरिंगचा मित्र "माळाकोळीकर". त्याचं अख्खं नाव कुठे लिहित बसा म्हणून फक्त Malaच लिहिलं. या थेअरीवर कोणी विश्वास ठेवेना. होता होता त्यांना ते मान्य झाले.
तर दिवाचा ऍक्सिडेंट होणे म्हणजे एखादा चवथी पाचवीतला मुलगा "भलत्या" आरोपांसाठी पकडला जाण्या सारखे होते! आता का? दिवा तसा एकदम पापभीरु वगैरे कॅटेगरी मधाला पोरगा. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग च्या आमच्या वर्गात होता. त्याला पाहून तो मेकॅनिकल मध्ये इंजिनिअरिंग करणार यावर विश्वासच बसत नसे. एकदा आम्ही असेल आमच्या कॅन्टिन जवळ कटिंग पीत उभे होतो. तिथे काही ऍटलस सायकली "पार्क" केल्या होत्या. (लहानपणी मला NO Parkingच्या बोर्डचा अर्थ उद्यानात खेळण्यास मनाई आहे असाच वाटायचा!असो). तर आम्ही असेच बोलता बोलता कोणाचा तरी धक्क लागला आणि एका ऍटलस चे स्टँड निघाले. ते मेन स्टँड असते ना ते. म्हणजे जे लावण्या साठी सायकल ओढावी लागते ते. दिवा जवळच उभा होता. मी म्हटलं दिवाला "अरे मी धरलीये सायकल तू स्टँड लाव". यावर दिवाने जे काही उत्तर दिलं होतं ते अगदी ऐतिहासिक होतं! म्हणजे कॉलेज च्या मेकॅनिकल इंजिनिअरींग च्या इतिहासात बोल्ड अक्षरांनी लिहून ठेवावं असं. आमच्या कडे असाही एक विद्यार्थी होवोनी गेला!! काही अंदाज करायला जाउ नका. त्याचं ते ऐतिहासिक उत्तर होतं "मला स्टँड लावता येत नाही ..."
ऐकणारे सगळे गार झाले.मला वाटलं लेकराची ऐकण्यात काही गडबड झाली असेल म्हणून पुन्हा सांगितलं..अबे सायकलचं स्टँड म्हणतोय मी. त्यावर पठ्ट्याचं उत्तर अगदी मंद आवाजात "अरे मला येत नाही"!! काय रिऍक्शन द्यावी हेच कळेना.मी मग भनकलो. अबे मेकॅनिकल ला आला ना तू साधं सायकलचं स्टँड लावता येत नाही.
त्या प्रसंगापासून मी नेहमी त्याची शाळा घ्यायचो. प्रश्न विचारायचो आणि फुकटात ज्ञानदान करायचो. टपल्या मारायचो त्याला डिवचायचो. त्याची रिऍक्शन एकच यायची. "निल्या तू जरा व्यवस्थित रहा!!!"
सांगायचा उद्देश. आमचा दिवा हा असा होता. त्याचा आणखी एक गुण म्हणजे त्याला कुठचीही टू व्हिलर येत नसे. अजूनही येत नाही. इंजिनिअरींग ची चारही वर्षे तो कोणाच्यातरी पाठकुळीला बसून येत असे. एकदा तर मी त्याला पल्लवीच्या स्कूटी मागे बसून जाताना पाहिलंय. अगदी विलोभनीय होतं ते चित्र. हा गोंडस सभ्य बाळ तिच्या मागे त्याचं ते टिपिकल दप्तर घेउन बसलेला.
दिवाने अयुष्यात कधी गाडी चालवली नाही आणि आपल्याला येत नाही याचं फारसं काही वाटत नव्हतं. या जनरेशन मध्ये गाडी न येणं म्हणजे दुसर्यावर किती डिपेंडंसी. पण मामा कडे वगैरे जाताना हा रिक्षाकरुन जायचा.त्याला सगळे मित्र डिवचायचे त्यामुळे शिकण्याचा निर्धार करुन त्याने एक दिवस स्कूटी चालवायचे ठरवले. अनुराग पत्क्याने आपल्या स्कुटीची तमा न बाळगता त्याला शिकवण्यासाठी व्हॉलंटिअर केलं. त्या दिवशी दिवा स्कूटीला घेउन धडपडला. पतक्याच्या गाडीची नुसकानी झाली आणि दिवाची गाडी शिकण्याची शेवटली संधी पण हुकली.
दिवा एकदम सरळ मनाचा निष्कपट माणूस.कसलीही डिमांड नसलेला. त्यामुळेच तो आमचा खास बनला. फर्स्ट इयर ला आमच्या ड्रॉईंगशीट पण बनवून द्यायचा. जमेल त्याला जमेल तशी मदत तो करायचा. नंतर नोकरी लागल्यावर साहेबांच्या घरी कंपनीची बस यायची. अगदी स्कूलबस जशी पोरं गोळाकरत फिरते तशी यांच्या कंपनीची बस फिरायची म्हणून साहेबांचं भागत होतं. मग औरंगाबाहून दिवा पुण्याला चांगला जॉब मिळाला म्हणून आला होता.
इकडे पण तो पेम्टी (PMT)नेच फिरायचा. त्याचा ऍक्सिडेंट व्ह्यायचा म्हणजे पेम्टीच पलटायला हवी होती. काही समीकरण लागत नव्हतं.नक्की काय झालंय हे विचारावं म्हणून त्याला फोन केला.
मी "काय दिवा धडपडलास म्हणे ! कुठे आहेस आत्ता?" दिवा- "अरे संचेती मध्ये आहे. पायाचं हाड तुटलंय. रॉड टाकलाय. उद्या एक ऑपरेशन आहे." मी "होय काय. कसं आहे रे हॉस्पिटल? च्यायला नेहमी बाहेरनंच पाहायचो मी! सही आहे तू आत गेलास." दिवा अजिबात न चिडता हॉस्पिटल बद्दल सांगायला लागला. मग मी त्याला आजुबाजुला चांगल्या पेशंट्स कोणी असतील तर सूत जुळवून टाक असा सल्ला दिला. दिवा म्हणाला"अरे काय घेउन बसलायसं. हाड जुळवायला आलोय मी इथे सूत नाही". तर पहिली ५ मिनिटे अशा संवादात गेल्यानंतर मी विचारलं "अबे ते जाउ दे आता ऍक्सिडेंट कसा झाला ते सांग."
तर त्याचं असं झालं होतं की साहेब पिम्टी मधून जात होते. स्टॉप आला आणि दिवा उतरायला लागला. उतरुन एक सेकंद होतो ना होतो तोच समोरुन एक सुमो येउन याच्या पायावर धडकली. पायाच्या हाडाचे किटकॅट चॉकलेटच्या जाहिरातीत करतात तसे तुकडे झाले! लोक गोळा झाले. याला त्याच सुमो मध्ये टाकून हॉस्पिटलला नेण्यात आले. एक ऑपरेशन त्याच दिवशी झाले. दुसरे एक दोन दिवसात करायचे आहे. तो म्हणत होता "अरे हाड तुटलं ते दिसत होतं मला". मी म्हटलं अरे लेका मग मोबाईलच्या कॅमे-याने फोटो नाही का घ्यायचास !!

अशा मस्करी नंतर त्याला जगाचा न्यायच असा आहे हे समजावलं. आपण धावत पळत स्टॉप वर पोचल्यावर कळतं की बस अत्ताच गेली. आपण जेव्हा वेळेच्याआधी पोचतो नेमकी त्या दिवशी बस लेट असते. भरपूर अभ्यास केलेल्या सब्जेक्ट मध्येच कसेबसे ४० येतात. न अभ्यास केलेल्या विषयात मटका लागतो. नेमका आपण स्किप केलेले प्रॅक्टिकल (किंवा प्रोग्राम) आपल्याला परीक्षेमध्ये येतो मग बदलून घेण्याचे ५ गुण वजा होतात. अख्ख्या बॅच मध्ये असं करणारे नेमके आपणच असतो. परीक्षेमध्ये सर्रास चिठ्ठ्या मारणारे कधी न पकडले जाउन रिकाम्या जागा भरा मधली एखादी रिकामी जागा आपण कोणाला तरी विचारतानाच परीक्षकाचे लक्ष आपल्याकडे जाते. एखाद्या मुलीला शाळेत असताना आपण आवडत होतो हे आपले लग्न झाल्यावरच कळते.टिचिंग अस्टिंटशिपची जागा आपल्याच मित्राला मिळाल्यावर ती गेल्याचे कळते! आपण इंडियाचं तिकिट काढल्यावर नेमकं दोन चार दिवसांनीच ते २००$ नी स्वस्त होतं! इकॉनॉमी मधनं बिलियन्स ऑफ डॉलर्स आरामात नेणा-यांना काही होत नाही आणि एखाद्या रविवारी दुपारी बाबा झोपले आहेत हे पाहून त्यांच्या पाकिटातनं ५ रुपये काढताना आपणच पकडले जातो !
तर लोकहो स्कंध पुराणाचा हा अपघाताध्याय अम्ही इथेच संपवतो. तयाचे तात्पर्य हेच की कोणासोबत काहीही होउ शकते. हे आता आम्ही ध्यानात घेतले आहे.दिवा चा ऍक्सिडेंट होउ शकतो तर माझे पण एक दिवस लव्ह मॅरेज झाले तरी त्याचे फारसे आश्चर्य मानुं नयें !
आपला(अभिलाषी)
अभिजित!
8:07 PM
Posted by
निल्या

ही रेसिपी खास माधवी साठी. भाजीला सुरुवात करण्या पूर्वी एकदा अटॅच केलेले फोटो मोठे करुन पहा.
वांगी(वांगे काही म्हणा) देठ काढून देठाच्या बाजूने उभ्या चार चिरा देउन पाण्यात टाकावीत. आता थोडावेळ त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही(वॉल मार्ट मध्ये वांगं म्हनूण नुसतंच साईझ ने मोठं आणि चवीने शून्य असं काही मिळतं त्यावर हा प्रयोग करु नये.)
या भाजीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मसाला प्रिपरेशन.
मसाला:
दोन मोठे कांदे (अमेरिकेत/इतरत्र असल्यास एकच मोठा कांदा)बारीक चिरावे. ते तसे न चिरल्यास मसाला नीट होत नाही. बारीक चिरा अथवा किसा (कांद्याला! पावभाजीवाला कसा बारीक चिरतो अगदी तसं. तदनंतर मुठभर किसलेले सुके खोबरे व २ चमचे तीळ (नसले तरी चालतं)तव्यावर भाजून घेणे. हे किसलेल्या कांद्यात मिसळा.
लाल तिखट १ चमचा, काळा मसाला, मीठ, खवलेला ओला नारळ, कोथिंबिर, एक चमचा तेल, दाण्याचे कूट २ चमचे, थोडा गूळ घालून मस्त मिक्स करुन घ्यावं. वांगं वातुळ असतं म्हणून त्यात गूळ घालावा हे "मातीच्या चुली" पाहून एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच.
आता मसाला वांग्यात भरुन घ्यावा. थोडा मसाला बाजुला काढून ठेवावा.
भाजी:
जाड बुडाच्या पातेल्यात तेल,मोहरी,हिंग,हळद घालून फोडणी करावी. त्यात मसाला भरलेली वांगी टाकुन फ्राय करुन घ्यावीत. चांगली फ्राय झाली पाहिजेत.थोड्या वेळाने थाळीत पाणी भरुन ते भाजीच्या भांड्यावर ठेवावे.गॅस बारिक ठेवावा. दोन वाफा येउ द्याव्यात. म्हणजे वांगी शिजतील.(अमेरिकेतली वांगी शिजायला जास्त वेळ लागतो. कधी कधी बाहेरचं आवरण करपतं आणि आत कच्चं राहतं. सो मंद गॅस इज द की)
आता सिंपल आहे मघाशी थाळ्यात ठेवलेलं पाणी आत टाकावं, चिंचेचा कोळ करुन तो त्यात टाकावा. आणि सुरुवातीला काढून ठेवलेला मसाला आता टाकावा. अभी मिक्स करनेका आणि थोडा ढवळनेका. पण वांगी तोडनेका नही.मग झाकण ठेवणेका.
रस किती पाहिजे त्यानुसार पाणी टाकून वांगी पूर्णपणे शिजवावीत.
सजावट:
ओलो खोबरे आणि कोथिंबीर घालून छान सजवावे.
टीप:
१. जाड बुडाचे पातेले नसेल तर तवा ठेवावा त्यावर भांडे ठेवावे.
२. पाणी घालण्या आधी वांगी परतणे महत्त्वाचे आहे अन्यथा भाजी पाणचट होते.
9:09 PM
Posted by
निल्या

"आई, काय गं तू नेहमी भाकरी करतेस ?",असं म्हणून तडतड करणारा लहानपणीचा ’मी’ अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. आईला सगळं येतच असतं. आई स्वयंपाक करते त्यात विशेष काय असं तेव्हा वाटायचं. तिला कष्ट पडत असतील आपण काही मदत करावी किंवा निदान नावं तरी ठेवू नयेत हे माझ्या गावीही नव्हतं. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे भाकरी ! नाही नाही मित्रहो मागच्या वेळी सारखी मी भाकरीची रेसिपी सांगणार नाहीये. ती श्टोरीचा अनएव्हीटेबल पार्ट म्हणून आली तर येउ शकते इतकंच !
तर २००६ च्या जुलै महिन्यात मी अमेरिकेला आलो. (हे सांगताना ई- सकाळच्या "पैलतीर" सदरात "माझे अमेरिकेतील अनुभव" छाप मथळ्याचे लेख छापून आणण्यात धन्यता मानणार्या लोकांसारखी माझी छाती वगैरे काही फुगुन आलेली नाहीये ! या लोकांनी आपण भारताच्या वतीने किंवा सकाळचा जो वाचक वर्ग असले लेख वाचतो, त्या जनतेच्या वतीने अमेरिकेत आलेले पहिले वहिले नागरिक आहोत आणि इकडील अनुभव लेखन करणे आपले सामाजिक कर्तव्य आहे. असा स्वत:चा समज करुन घेतलेला असतो! ब्लॉगच्या आगामी अंकात त्या लोकांवर तोंडसुख घेण्याचा माझा मानस आहे!)असो. अमेरिकेस आलो ते सांगावे लागले कारण ष्टोरी चा तो अविभाज्य भाग आहे.
आमच्या विद्यापिठामध्ये बरीच मराठी मंडळी होती.(जिथे विद्येचा कीस पाडला जातो म्हणून कदाचित त्या ठिकाणास "विद्या-पीठ" महणत असावेत !) (असो. वाईट होता.) ७५% आंध्रजनांच्या मानाने ५% म-हाटी जनता आमच्यासाठी बरीच होती!सगळ्यांना मायभूमीची आठवण करुन द्यावी म्हणून मी सरप्राईज़ भाकरीचा बेत आखला. मस्त ५-६ वाट्या पीठ (अफकोर्स ज्वारीचं! मी पुण्या मुंबईच्या मुलींसारखा स्वयपाकात तेवढाही काही "ढ" नाहीये !) घेउन मळायला सुरुवात केली. आणि भाकरी थापायला घेतली आणि थापताच येईना. च्यायला आता काय करायचं? सगळे प्रयत्न करुन झाले थोडं पीठ मिसळलं, मग मिश्रण घट्ट झाल्याने त्यात थोडं पाणी मिसळलं.सहाजिकच पाणी जास्त झालं, त्यात पुन्हा पीठ टाक असे प्रकार सुरु झाले. पुन्हा एकदा पाणी टाकल्यावर लक्षात आले की राजा हे "फ्रिकी चक्रा" असेच सुरु राहिले तर सगळं पीठ संपून जाईल आणि हाती पिठाच्या गोळ्याशिवाय काही लागणार नाही.(तसंही आजवर हाती काही लागलं नाहीये, पण असो ते विषयांतर होईल.) गाजावाजा करुन मराठी जनतेला घरी बोलावलं होतं त्यामुळे त्यांना आयतीच संधी मिळाली. माझी यथेच्छ टिंगल करुन मंडळी निघून गेली. मीच पाय पुढे केला होता मग ते तर ओढणारच! एरव्ही मराठी लोकं पाय पुढे न करताही एकमेकांचे पाय ओढतात. इथे तर त्यांना चांगलं निमित्त होतं.
इतर मंडळी गेली असली तरी मी धीर सोडला नव्हता. न जाणो काही चमत्कार होउन यातून खाण्यायोग्य तरी भाकरी बनवता येईल असा माझा विश्वास होता. भाकरी थपता येत नव्हती यावर उपाय म्हणून डायरेक्ट तव्यावर गोळा ठेवून तो पसरवून पाहिला. थोडा गोल आकार आला. जरा समाधान वाटलं.
पण लग्नाच्या वेळी सुबक वाटाणार्या बायका एका बाळंतपणानंतर जशा आपला शेप सोडून अस्ताव्यस्त पसरायला लागतात तशी माझी भाकरीही हळूहळू शेप सोडू लागली.आकराशी काय करायचे चवीने समाधान झाले म्हणजे झाले, अशी त्या नवर्यांप्रमाणे आपली समजूत काढीत (भाकरीबद्दल हां !!!) मी पुढे आणि काय होतंय ते पाहू लागलो.शेवटी व्हायचे तेच झाले. भिजलेल्या खपटाप्रमाणे तयार झालेल्या पदार्थांच्या त्या अनौरस अपत्याचे नामकरणा न केलेलेच बरे असे मला वाटले. कुमारीमाता आपल्या अर्भकास अनाथाश्रमाच्या दाराशी किंवा हिंदी सिनेमाप्रमाणे कच-याच्या पेटीत टाकून लोकांच्या नजरा चुकवून चोरट्या अंगाने जशा पळ काढतात तसं हे पिठाचं लोढणं कुठे तरी दडपून आपणही किचनच्या बाहेर पळ काढावा असं वाटत होतं! पण मी काही कच्च्या गुरुचा चेला नव्हतो. त्या पदार्थास काही तरी भविष्य द्यावे म्हणून मी आता त्याच पिठातून थालीपीठ करायच्या प्रयत्नाला लागलो. आणि माफक प्रमाणात यशस्वीही झालो.
पण भाकरी जमली नाही हा आरोप जो माथी लागला तो लागलाच. इंडियातून निघताना मला चांगली जमली होती हे आठवत होतं. नेमकं इकडे काय बिनसलं होतं काय जाणे. पण तिकडे पीठ कालवाताना पाणी किती टाकायचे हे सांगायला आई होती. पण इकडे मी पहिल्यांदाच सत्ता हाती आलेल्या जवाहरलाल नेहरु सरकार सारखा धडपडत होतो!
तर सांगायचा हेतू हा की त्या दिवसापासून मी भाकरीचा धसकाच घेतला. कधी कधी भाकरी खाण्याची लहर येई पण पुढे मागे बायको आल्यावर करेल ती, अशी मनाची समजूत घालत होतो. मध्ये थोरल्या बंधुंचं शुभमंगल असल्याच्या योगानं देशावर एकदा वारी झाली पण जेमतेम दहा दिवस घरी होतो आणि त्यात लग्न. या धांदलीत लक्षात असून सुद्धा भाकरी खायचं विसरुन गेलो. एकूणात आज दोन वर्षात भाकरी खायचा योग आला नव्हता.शेवटी तब्बल जवळपास दोन वर्षांनंतर मी पुन्हा एकदा भाकरी करण्याची हिंमत केली. माझा रुममेट गावाला गेलेला. त्यामुळे जे काही बरंवाईट होईल ते आपल्यावरच होईल. हे माहिती होतं. इतरांचं टेंशन नव्हतं. आज यशस्वी होउनच बाहेर यायचं अशी मनाशी गाठ बांधून मी किचन मध्ये शिरलो.
इकडे जे पीठ मिळतं ते ताजं नसल्याने भाकरी बिघडते. त्यासाठी गरम पाणी करुन ते पिठात मिसळावे असा अतिशय महत्व पूर्ण सल्ला देशपांडे काकूंकडून मिळाला. इकडे भाकरी थापायला परात नव्हती त्यामुळे त्यावर मी एक शक्कल शोधून काढली. सरळ कटिंग बोर्डवर भाकरी थापायची. थापताना एकाच दिशेने भाकरी फिरवायची म्हणजे तुटत नाही. हाताला पीठ लावत लावत प्रेमाने फक्त चार बोटाचा वापर करुन भाकरी थापली की आपोआप चांगली होते. तवा अगदी गरम असला पाहिजे. मग अलगद पिठाची बाजू वरच ठेउन भाकरी तव्यावर टाकायची. त्यावर पाणी टाकून हाताने फिरवून सारखे करुन घ्यायचे.वरचा भाग थोडासा कोरडा पडला की भाकरी पलटायची. चांगली भाजली की नंतर विस्तवावर धरायची. भाकरी आपोआप फुलते. हे थेरॉटिकल नॉलेज घेउन मी पुढे झालो. स्टेप्स तंतोतंत फॉलो केल्या.
सुंदर मुलीला आपण तासभर टापावं आणि काही अपेक्षा नसताना अचानक तिने स्माईल द्यावी तशी गत झाली हो!ध्यानी मनी नसताना भाकरी झक्कस बनली. दिसायला तर अगदीच भाकरीसारखी होती!! शेवटी भाकरी असो वा पोरगी दिसणे महत्वाचे !! पुढचे पुढे पाहता येतं. काय बरोबर आहे की नाही? :)
मला मग अगदी रहावेचना. आणि मी चक्क भाकरी लोणच्याबरोबर खाल्ली. आहाहाहा. ती चव म्हणजे अगदी अविस्मरणीय ! शाळेत शिकवणारे जुने मास्तर रस्त्यावर भेटावे आणि जुन्या आठवणी उफाळून याव्या तशी आमच्या मेंदूत भाकरीची जुनी चव चेतवली गेली. अगदी आई करते तशी चव झाली होती. येsssssss स्वत:ची पाठ थोपटून घेतली मी. आणि मग बेत एकदम फाकडूच करावा म्हणून भराभरा पिठले करायला घेतले. मी पिठले करायल जाउन बर्याच वेळा शेकून घेतलं आहे! दरवेळी पिठाच्या गुठळ्या व्हायच्या. घरी बसून या पदार्थांवर आयता ताव मारणार्यांना यातली कळकळ उमजायची नाही. पाणी गरम करुन पाहिलं, पीठ हळूहळू पेरुन पाहिल. पण नाही. शेवटी एक हमखास उपाय मिळाला. फोडणीत पाणी टाकून नंतर पीठ मिसळण्यापेक्षा आधीच थोडे गरम पाणी करुन त्यात हाताने पीठ मिसळावे. म्हणजे गुठळ्या होत नाहीत.
एकाचा एकेक दिवस असतो म्हणतात. तसा आजचा दिवस माझाच होता. सगळं व्यवस्थित झालं होतं.सगळी मेहनत करुन शेवटी तीन भाक-या आणि पिठलं घेउन जेवायला बसलो. याज साठी केला होता अट्टाहास असं वाटायला लागलं. काही तरी मिसिंग आहे असं लक्षात आलं. भाकरीवर मग चमचाभर तूप ओढलं. आणि स्वर्ग दोन बोटे राहिला! तसा स्वर्ग दोन बोटांच्या अतंरावर बसच्या प्रवासात, रांगेत बर्याच वेळा येउन गेलाय. पण हा स्वर्ग निराळा ! लागलीच इंडियात आईला फोन करुन माझा पराक्रम सांगितला. घरी फोन करुन स्वपराक्रम सांगण्याचे प्रसंग तसे विरळच ! नाही तर एरव्ही आमच्या प्रतापांनी त्रस्त झालेल्या लोकांनीच ते काम स्वत:वर घेतलं होतं ! फोनवर आईला पण भडभडून आलं. लेक नसल्याने जी कमी वाटत राहिलेली ती मी भरुन काढतोय असं वाटून तिला समाधान वाटलं.
तीन भाक-या बकाबका संपवल्यानंतर जी संपॄक्तता वाटली त्याला तोड नाही. इतके दिवस आपण या सुखाला पारखे राहिलो होतो हे जसं लग्नाच्या पहिल्या राती नव-याला जाणवतं तसंच मलाही वाटून गेलं! जेवण संपवून स्वयंपाक घरात परतलो. नुकतच एखादं महायुद्ध संपलेल्या रणांगणासारखी हालत झाली होती. जिकडे तिकडे अवशेष पडले होते. पीठ मळायला घेतलेलं भांडं त्याच्या आजूबाजूला सांडलेलं पीठ, खरकटा तवा, चिकट झालेला कटिंग बोर्ड, पाणी ओतण्यासाठी घेतलेल्या काचेच्या ग्लासवर, गॅस बंद करायच्या बटणावर लागलेली पिठाची बोटे, जमिनीवर सांडलेलं पायाला कचकच लागणारं पीठ हे सगळे झालेल्या घटनेची हकीकत ओरडून सांगत होते. त्यांना गप्प करणं भाग होतं. पोटात पडायचं ते पडलं होतं त्यामुळे सगळं आवरायला अगदी जिवावर आलं होतं. हे सगळं आवरायला रात्रीचे साडे दहा झाले.
सगळं आवरुन चकाचक करुन झोपण्याच्या तयारीत होतो आणि अगदी ध्यानी मनी नसताना अचानक ती आली !ती आली आणि मन अगदी तिच्या जुन्या आठवणीत रमुन गेलं, चेहर्यावर आपसूकच समाधान उमटलं. बर्याच दिवसात तिचं येणं झालं नव्हतं. तिच्या येण्याने आनंदलेल्या मनाने मी बेडरुमकडे वळलो. आपल्या वाचकांत बरीच वात्रट जनता भरली आहे आणि त्यातली अनेक मंडळी मला चांगल्याप्रकारे ओळखतात म्हणून जाता जाता शंकेला वाव नको म्हणून तिचं "नाव घेतो".
आपला ना कुणी वाली ना कुणी केअर टेकर
आणि जी आली होती
ती म्हणजे दुसरी तिसरी कुणी नव्हे
तर होती ढेकर !!!
-----------------------------------------------------------------------------------