चला दोस्तहो मत्कुणांवर बोलु काही ! (अध्याय १)

Category:

सकाळच्या पाचाला फोन खणाणला. भारतातले मित्रच ते अवेळी फोन करायचेच ! त्याचं आता फारसं काही वाटत नव्हतं, पण तरीही सकाळची झोपमोड झाल्यामुळे विशेष कारण नसणा-याने फुलटू शिव्या खाल्ल्या असत्या. फोन उचलला तिकडून रंग्या किंचाळलाअबे अभ्या ऊठ एक न्यूज आहे!”, आजकाल रंग्याच्या न्यूज मध्ये काही दम राहिला नव्हता म्हणून मी त्याला लाईट घेतलं, तो जेवढा जास्त एक्साईट होतो तेवढी बकवास न्यूज असणार हे माहित होतं. तरी डोळे चोळत बेड मध्ये उठून बसलो आणि पाहतो तर काय, रात्रीची शिफ्ट संपवून घरी परतणारी बिपीओ मधली पोरं जशी बाईक उंडारतात त्याच गतीनेसाहेबघाई घाईत घराकडे निघाले होते. त्यांना पाहून आमची पाचावर धरण बसली. रंग्याला सांगितलंतुझी न्यूज गेली खड्ड्यात इथे माझ्या पोटात खड्डा पडायचीवेळ आली आहे! नंतर फोन करतोउत्तराची अपेक्षा करता फोन बंद केला आणि साहेबां कडे जरा लक्ष दिलं. साहेब जरा ओळखीचे वाटत होते. मागे एकदा फार फार वर्षांपूर्वी गाठ पडली होती. ती कटू आठवण आठवून मनातमी प्रार्थना सुरु केली की हे साहेब ते जुने साहेब नसावेत! पण दैवदुर्विलासाने आमचे साहेब जुने साहेबच निघाले ! किचन मध्ये पळत जाउन एक टिश्यू आणला. साहेबांना त्यात उचललं. गॅलरित नेवून कागद पेटवून अगदीआगतिक मनाने साहेबांचे अंत्यसंस्कार केले. आपण कोणत्या संकटात सापडलो आहोत आणि पुढे काय कायवाढून ठेवले आहे याचा विचार करायला लागलो. एवढ्या सुंदर आपार्ट्मेंट मध्ये हे असे काही घडेल असेल वाटले नव्हते.


एकूण विषयाचं गांभीर्य अनुभवी वाचकांच्या ध्यानात आलं असेल. आमचेसाहेबम्हणजे आद्य घड्याळजी नव्हेतर सर्वजनांत अप्रिय कीटकरक्त्बीजऊर्फमत्कुणऊर्फखटमलऊर्फढेकूणहोत ! ढेकणावर कोणी कधीलेख लिहितं का? असं तुम्हाला वाटलं असेल. राईट बंधुंनाहीमाणूस कधी उडू शकतो का?” असं म्हणून लोकांनी वेड्यात काढलं होतं ! म्हणून संकुचित मनोवृत्तीच्या लोकांकडे दुलर्क्ष करीत आम्ही जिद्दीने हा विषय येथे मांडणार आहोत. लोक कुत्र्यावर, मांजरावर, पोपटावर, हॅमस्टरवर, उंदरावर अगदी कहर म्हणजे बायकोवरही लिहितात मग ढेकणाने कोणाचे घोडे मारले आहे? शिवाय हा आंतरराष्ट्रीय प्रश्न असल्याने यावर सखोल विवेचन होणे आवश्यक आहे असे आमचे मत आहे. ज्यांना शीssss इय्यूsss याकssss !!” या पैकी काही वाटत असेल त्यांनी आल्या मार्गी बॅक बटन दाबुन परत जावे!


प्रश्न गंभीर होता पण उपाययोजना करणे तेवढेच आवश्यक होते. प्राथमिक धक्क्यातून बाहेर आलो. बेड रुम मध्ये शिरलो! एकेका गनिमाला शोधायचे ठरवले. आता आमच्या अंगी बुश संचारला होता. लादेनसाठी बुशने अफगाणिस्तानाला कसा त्राही त्राही करुन सोडला होता तसा आम्ही आमच्या बेडरुमचा अफगाणिस्तान करुन सोडला होता. अचानक छापा टाकाण्याचं तंत्र सुरुवातीला चांगलंच यशस्वी झालं चार पाच निद्रिस्त गाफिल गनिम एकाच ठिकाणी गावले. विलास (राव नव्हे !) हे विनाशाचे कारण आहे याची प्रचीती आली. त्या प्रणयी मत्कुणांना तशी प्रचीती येण्याच्या अवस्थेत ते नव्हते. ६० च्या दशाकात अमेरिकेत मनुष्य जातीत अशी स्नेहसम्मेलने होत असत. (शहाण्यांना वरुन ताकभात लक्षात आला असेलच!)


आमच्यावर हल्ला झाला आमच्यावर हलला झाला अशी बोंब ठोकत बुश जगभर सुटला तसे आम्ही गुगलवर बोंबलत सुटलो. एवढे गुगल केले तरीही ढेकणांना आवरावे कसे हे बिंग काही फुटले नाही! (बिल महाराष्ट्रात जन्मला असता तर लोकांची बिंगे फोडणारी प्रॉडक्ट्स बाजारत आणतो म्हणून त्याला मराठी मिडियाने चावट ठरवला असता ! असो.) मी नेट्वर मिळतील ते रिसर्च पेपर्स आर्टिकल्स वाचत सुटलो.


डिटीपी ने १९६० च्या काळात अमेरिकेत मत्कुण मरायचे हे कळाल्या नंतर ६०च्या दशकात अमेरिकेत नसल्याचा खेद वाटायला लावणारे अजुन एक कारण वाढले ! डिटीपी पचवायला शिकुन हे जीव अमेरिकेत आंध्रजनांप्रमाणेहळूहळू सर्वदूर पसरले. अगदी क्वचितच अगदी कळकट ठिकाणी वाढणारे हे अगदी पॉश पॉश घरात पण वाढु लागले. थोडक्यात काय तर त्यांचे रहणीमान सुधारले. त्यांची एवढी प्रगती झाली असेल असे वाटले नव्हते. गुगलायन केल्याने -याच गोष्टी कळाल्या, एक वर्ष खायला नाही मिळाले तरी हे व्यवस्थित जगु शकतात. आमच्या राजकारण्यांना सांगा कुणी तरी हे जरा !


अब बस एक ही बात, संपूर्ण स्वराज:

.मो.. गांधीं प्रमाणे आम्ही एकच ध्येय घेउन कामाला लागलो. (आज काल नुसतं गांधी म्हणून भागत नाही.कोणते गांधी ते सांगावं लागतं.नाही तर बीजेपी कॉंग्रेस दोघांनाही वाटायचं की त्यांच्याकडे बोट दाखवतोय.) मो.कंच फक्त ब्रीदच तेवढं घेतलं. "अहिंसा" हे तत्त्व घेतलं नाही ते बरं. मला चावून चावून एक दिवस आत्मसाक्षात्कार होवून ढेकूण स्वत:हून घर सोडून निघून गेले असते अशी सुतराम शक्यता नव्हती! त्यामुळे हिंसा अपरिहार्य होती. भारताने रशियाकडून शस्त्रास्त्रे मागवावीत त्या प्रमाणे आम्ही कम्युनिटी (एक संघ पणा कमी असल्याने, कम+युनिटी असा या शब्दाचा संधिविग्रह असु शकतो !) मालकांकडून मदत घ्यायची ठरवली. मालकांनी इन्स्पेक्शन करण्यास एक दूत धाडिला. शाळा तपासणी साठी इंस्पेक्टर यावा आणि पोरं गोंधळ करताना सापडावीत अगदी तसं झालं. तपासणीसाहेब आले आणि चक्क दिवसा ढवळ्या सहलीवर निघालेले दोनगनीम सापडले. त्यामुळे लगेचच एस्टिमेट्सचा आकडा मनातल्या मनात वाढवला असणार. तपासणी साहेबांनी अहवाल चाळमालकांकडे जमा केला. दुस-या दिवशी चाळामालक ट्रीट्मेंट करावीच लागेल म्हणाले. च्यायला ट्रीटमेंट करायला काही हरकत नव्हती पण त्यांनी जो आकडा सांगितला तो ऐकून आमचा बजेट प्लानच वाकडा झाला. ४२५ डॉलर्स !!!! म्हणजे ढेकणं मारायचे तब्बल २१००० रुपये !!! आमच्या घरात साधारण १० असतील. तर सरासरी एका गृहस्थाला घराबाहेर काढण्यासाठी २१०० रुपये?? च्यामारी आम्हाला घराबाहेर होण्यासाठी कुणीकधी पैसे नाही दिले. केवळ एकदा नवीनच लग्न झालेल्या मावस भावाने प्रायव्हसी मिळावी म्हणून मला घराबाहेर पिटाळण्यासाठी २० रुपये दिल्याचं आठवतं. आमचं तशी काही सिच्युएशन नसताना आम्ही ह्या साहेबांना घराबाहेर जाण्यासाठी २१००० रुपये??


घरात फावारणी होईपर्यंत तीन रात्री काढायच्या होत्या. त्या पण शत्रूचा फौज फाटा दांडगा असताना ! आम्ही गनिमी गनिमी कावा अवलंबायचा ठरवला. रात्री एक दीड अडीच चे अलार्म लावून झोपायचे अचानक छापा मारायचा. एक दोन वेळा वगळाता प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. झोपेचा मात्र बट्ट्याबोळ झाला होता. आमची अवस्था ख-यांच्या खालील कवितेतल्या पहिल्या "मी" सारखी झाली होती ! खरे प्रेम्यांची माफी मागुन चार ओळी खरडतो. (यात खरे आलेच हे एक गृहितक !)


मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो

तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो ।


मी जुनाट दारापरी किरकिरा, बंदी

तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी

मी बेड त्यजुनी काउचवर जाउनी बसतो

तो लंघून चौकट काउचावर याया बघतो ।


डोळ्यांत माझिया सूर्याहून संताप

दिसतात त्वचेवर चाव्यांचे मोजूनी, माप !

आमुचेच रक्त हे पिवुनी तो

घडवून लेकुरे रजईवरती झुलतो !!


मी पायी डसल्या ढेकणांवरती चिडतो

तो त्याच घेऊनी अंडी मांडून बसतो

मी डाव रडीचा खात बेगॉन मारतो अंती

तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने मरतो !


आमच्या घरातली ढेकणं मेली की तगली?, ट्रिटमेंट्साठी काय काय आटापिटा करावा लागला? प्रकरणआटोपले की कॉंग्रेसच्यागरिबी हटावघोषणे सारखे अनंतकाळासाठी लांबले? हे सर्व पुढच्या भागात !

अध्याय २ येथे वाचा.

आजि म्या डबा नेईयला !

Category:

डबा म्हटल्यावर कुणाच्या डोक्यात काय येईल हे सांगता येत नाही. मुंबईकरांना लोकलचा, पुणे मुंबई प्रवास करणा-यांना इंद्रायणी एक्स्प्रेसचा, शाळेत जाणा-या एखद्या गंपूस लाडावाचा, बायका (व काही अभागी पुरुषांना) मसाल्याचा तर काहींच्या रिकाम्या डब्यात (डोक्यात!) दूरचित्रवाणी संचही येण्याची शक्यता आहे. पण आज आम्हाला ज्यावर भाष्य करायचे आहे तो आहे सकलजनक्षुधापरिहारक, वामकुक्ष्यामंत्रक व आलसोद्दीपक दुपारच्या जेवणाचा डबा !

आता मी मुंबईच्या डबे वाल्यांविषयी काही तरी लिहिणार अशा अटकळी तुम्ही बांधायला लागला असाल तर तिथेच थांबा. तिथुनच मागे फिरा. कुटुंबवत्सल गृहिणिंनो "मुलांना डब्यात काय द्यावे" असलं काही अपेक्षित असेल तर तुम्हि सुद्धा थांबायला हरकत नाही. डबेवाल्यांवरच्या पुष्कळ डॉक्युमेंट-या, लंडनच्या राजाच्या भेटीच्या बातम्या, सिक्स सिग्माचे फन्डे, डबे वाल्यांचं मॅनेजमेंट भारी असल्याच्या गोष्टी, झालंच तर भरत जाधवचा "मुंबै चा डबेवाला" हा स्वत:च्या नावाला जागणारा डब्बा सिनेमा वगैरे गोष्टींचा मारा झाल्याने तुम्ही एव्हाना त्या बाबतीत सज्ञान झाला असाल. बरे झाले तो सिनेमा हिंदीत डब नाही केला अन्यथा निर्माता आणि प्रेक्षकांचे पेशन्स *डबघाईला आले असते !
(* डबघाई म्हणजे अंताजवळ पोचणे. डफघाई या शब्दावरुन हा शब्द प्रचारात आला! )

प्रत्येक गोष्टीचं एक चक्र असतं. आपल्याला लहानपणी सोडुन गेलेलं, साधंवरण भाताचं जेवण आयुष्यात कधी तरी पुन्हा येउन भेटतं. अर्थातच म्हातारपणी. वय झाल्यामुळे, काही जड पचवता न येण्यामुळे मंडळी साध्या भातावर आली की एक चक्र पूर्ण झाले असे समजावे. आपले वय फार झाले आहे याचा तो अलार्म.
डब्याची अशीच एक सायकल असते असा आमचा समज आहे. लहानपणी शाळेत आपण डबा न्यायचो. ते अगदी दहावी पर्यंत. शाळेतला डबा म्हणजे मला एक प्रकारे चैतन्याचे प्रतीक वाटतो. आमची शाळा चांगली मधल्या सुटीसाठी ऐसपैस वेळ द्यायची, त्याचा पुरेपुर उपयोग आम्ही वर्गात/मैदानावर किंवा जागा मिळेल तिथे क्रिकेट खेळून, शाळेच्या गच्चीवर एमआरएफ च्या त्या लाल क्रिकेटच्या रबरी बॉल ने फुटबॉल खेळून घ्यायचो. हा खेळ आमच्या शाळेत अगदी इल्लिगल होता!

शाळेतल्या कट्ट्यावर एकत्र बसून डबा खाणे म्हणजे मजा असायची. वेगवेगळ्या प्रकारच्या, चविच्या भाज्या खायला मिळायच्या. मला इतरांच्या घरची लोणचीच जास्त आवडायची. त्यामुळे डबा म्हटलं की मधली सुटी आठवते आणि मधली सुटी आठवली की तो आनंदाचा, चैतन्याचा काळ आठवतो.
ज्युनिअर कॉलेज मध्ये हे चैतन्य मिळेनासे झाल्याने आमच्यातले काही जण चैतन्य कांडीत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायचे! त्या काळात खिशात थोडे फार पैसे खेळु लागलेले असत, त्यामुळे कॉलेज च्या कॅंटिनमध्ये चोचले चालत(आमच्या साठी केवळ जिभेंचे इतरंसाठी एसी किंवा फॅमिली रुम मध्ये चालायचे ते निराळे !)
इंजिनिअरिंग कॉलेजला असताना कॅंटिन आणि मेस मध्ये खाणे व्हायचे. त्यामुळे ४ वर्षांत डब्याचा प्रसंग येणे कठिण होते. अशा प्रकारे सुखेनैव आयुष्य कंठित आम्ही शिक्षणाची जोखीम संपवली. शिक्षण संपवता संपवता कुणा मध्यम वर्गिय सुंदर मुलिला बड्या घरचे स्थळ यावे त्या प्रमाणे आम्हाला एका बड्या कंपनीची नोकरी आली. कंपनी मल्टिबिलिअन डॉलर आहे म्हणून बडी नव्हे तर आमच्या सारख्या नतद्रष्टास मोठ्या मनाने नोकरी दिली म्हणून ती आम्हाला बडी वाटते. "जामातो दशम ग्रह:।" हि उक्ती ठाउक असुनही आम्हाला जो स्वत:चा दशमग्रह बनवुन घेईल असा बडा माणुस फक्त गवसायचा बाकी आहे!

राहत्या घरापासून पाच मिनिटांवर, म्हणजे बगलमेच आमचे कार्यालय असल्याने दुपारी हुंदडायला घरी येणे जमायचे. दहा मिनिटांत जेवण आटपून उरलेला वेळ भारतात फोन करणे किंवा अंतरजालावर काथ्याकूट करण्याचा कार्यक्रमांमध्ये आम्ही घालवायचो. सध्या काथ्याकुट मधल्या काथ्याची जागा ऑर ने घली आहे! हरकत नाही, "स्थळांचे संकेत" देणा-या संकेतस्थळांवर जाण्यापरिस आम्ही ऑर्कुटाशी मेतकुट जमवले होते. नंतर ते अति झाल्याने दुपारी लॅपटॉप उघडायचा नाही असा नियम आम्ही आमलात आणला होता. त्यामुळे पुस्तक वाच किंवा वामकुक्षी घे असा ऐष आराम चालायचा.

या आमच्या ऐष आरामाचे भारतातील मित्रांना अतिवर्णन करुन सांगितल्याने लवकरच अपेक्षित परिणाम झाला! आमच्याच कोणा तरी मित्र ग्रहाची वक्र दृष्टी पडल्यामुळे आमचे ऑफिस राहत्या घरापासून ७ मैलांवर गेले. त्यामुळे लवकर उठा, इंटरस्टेट रस्ता घ्या, ट्रॅफिक मध्ये अडाका, हे पूर्वी कधी न मिळालेले अनुभव यायला लागले. सुरुवातीला गोड वाटले. गुगलवर रोज सकाळी व संध्याकाळी परतताना वाहतूक पाहून मार्ग ठरवणे, अपघातझालेले रस्ते टाळणे हे सर्व करु लागलो. अमेरिकन लेबर फोर्स मध्ये आपण आलो असा अनुभव येउ लागला. वेलकम टू अमेरिका असे म्हणून स्वत:चे अभिनंदन पण करवून घेतले.

प्रश्न येउ लागला तो दुपारच्या जेवणचा. दुपारी पुन्हा तेवढे अंतर पार करुन फक्त जेवण्यासाठी घरी या हे म्हणजे चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला असा मामला झाला होता.(म्हणीतल्या कोंबडीची स्वस्ताई पाहता खरं तर त्या काळाच्या नागरी संस्कृतिचा हडाप्पा, मोहेंजोदरो सारखा आदराने उल्लेख करायला हवा. अशी संस्कृती अस्तित्वात होती हे महाराष्ट्रात कुठल्यातरी गावात उत्खनन करुन घरोघरी कोंबड्यांचे शेकडो अवशेष शोधून व न सापडल्यास, सापडले असे दाखवता येईल. यानंतरचा इतिहास तर सहज ओळखता येण्या सारखा आहे. कोंबड्या महाग झाल्या. त्यामुळे बामण व इतर कृपण लोक पटापट शाकाहारी झाले! शाकाहारची ही लाट प्रथम महाराष्ट्रातील बे एरियात उगम पावल्याची आख्यायिक आहे !! (काही सनातन लोक त्यास कोकण म्हणतात). भिक्षुकित मिळणा-या दिडकित भागेनासे झाले आणि घरातली काट्टी ऐकेनाशी झाली होती. काही तरी उपांय करणे गरजेंचे होतें. त्या मुळे विवंचनेत सापडलेल्या शास्त्र्यांनी विद्वत्सभा आयिजोत करुन त्या निष्पाप द्विजास अभक्ष्य ठरवून टाकले. तिथुन पुढे ती चळवळ (पैसे वाचवणारी असल्याने) फोफावत गेली.ज्यांना परवडे त्यांचा दु:स्वास केला जाउ लागला!



तर प्रश्न होता माझ्या दुपारच्या जेवणासाठी होणा-या १४ मैलांच्या रपेटीचा. शिवाय आजचा शुक्रवार खुनशी होता. सकाळी ८ पासून साडे पाचा पर्यंत मान खाली घालून सहस्त्रावधी क्लिक्स व काही शे शब्दांचा खडखडाट करुन काही तरी साधायचे होते.
त्यामुळे घरी जाण्यास वेळ मिळणार नव्हता. त्यामुळे सकाळच्या पारी उठुन लवकर आटोपून मी आज डबा भरला. आफिसात प्रथमच डबा नेल्यामुळे गृहस्थाश्रमात प्रवेश केल्या सारखे वाटत होते. माथी पुन्हा डबा आला म्हणजे आपले एक चक्र पूर्ण झाले, सुख की दिन गयो रे भैय्या याची जाणिव झाली! बायका नव-याला डबा भरुन देतात आणि तो न सांडता ऑफिसात घेउन जाणारा इमानी नवरा केवळ डोंबिवली फास्ट किंवा तत्सम चित्रपट,दूरदर्शन मालिकांमध्येच पाहायचो. अंकुश चौधरीला सुद्धा दीपा परब डबा भरुन देते अशी बातमी कालच सकाळला वाचली. ही काय बातमी आहे का? दीपा परब त्याची बायको आहेना? मग तीच देणार ना डबा! लोकांच्या बायका कशाला देतील ?


सारांश काय? तर आमचा संदीप कुळकर्णी झाला आहे, तुम्हाला बॅट घेउन दुकाने फोडायची नसतील , तर तुमच्यात,
नाटक आवडत असेल तर अतुल, हिंदी सिनेमात जायचं असेल तर सोनाली, सितार वाजवत असाल तर समीप, थोडंफार क्रिकेट आवडत असेल तर निलेश (भारतीय संघात जाण्याची अपेक्षा करु नका), संगीतात वेड्यावाकड्या कोलांट उड्या मारायच्या असतील तर सलील, साहित्यात जि.ए., प्रथम व्यापार व नंतर बसपाचे राजकारण करायचे असेल तर डि.एस., चित्रपट काढायचा असेल तर चंद्रकांत, काही जाहिराती व माफक प्रमाणात मराठी चित्रपट करुन माफक प्रसिद्धी हवी असेल तर मृणाल, प्राध्यापक व्हायचे असेल तर अ ते ज्ञ पर्यंत जेवढी अद्याक्षरे मिळतील त्यातली तुमच्या आवडीची कुठलिही दोन अद्याक्षरे, चांगला नवरा मिळवायचा असेल तर सुधा, नसेल तर ममता, व अध्यात्मात रस असेल ज्ञानेश्वर हे सगळे कुलकर्णी जिवंत ठेवा म्हणजे झाले !

कैरी

Category:

कैरी शिवाय उन्हाळा म्हणजे बायको शिवाय लग्न असे आमचे स्पष्ट मत आहे! जीवनात रस आणणा-या गोष्टींच्या यादीमध्ये प्रेयसी नंतर कैरीच! तात्पर्य आमच्या यादी मध्ये कैरी अग्रस्थानी विसावलेली आहे! तिचे प्रथम क्रमांकावरुन विस्थापन करण्याची मनीषा शिवडी- न्हावाशेवा पुलाच्या बांधकामा प्रमाणे चिरकालीन आणि अनादी काळापर्यंत चालणारी आहे.


हां तर आपला विषय आहे कैरी! ब्लॉग चे शीर्षक तरी तेच आहे. अमोल पालेकरांनी ह्या शीर्षकावर आक्षेप घेतला नाही म्हणजे मिळवली! या नावाचा त्यांचा एक चित्रपट असल्याने उचल प्रतिबंधक कायद्याचा आसुड माझ्यावर पालेकर उचलणार नाहीत अशी एक अपेक्षा.
("पालेकर कशाला कडमडातोय तुझा ब्लॉग वाचायलां.." हे टीकाकारांचे मनोगत आमच्या मनाला चांगलेच अवगत आहे!)

"कैरी" आमच्या बालपणीच्या सुखद आठवणींचे प्रतीक बनली आहे. वार्षीक परीक्षा जवळ आली की घरी कैरीची चटणी व्हायची. लहान पणी मला कुठचीही भाजी आवडत नसे. मुळात भाज्या हे मनुष्याने खाण्याचे खाद्य नाही असं माझं ठाम मत होतं. आई छान भाज्या बनवते पण ते वय असं होतं की भाजी खाणे म्हणजे माझ्या दृष्टीने शिक्षा तर आमुच्या ज्येष्ठ भ्रात्याच्या दृष्टीने अचिव्हमेंट असायची. भाज्यांचा शोध ज्या कुणी आजीने लावला असेल तिचा मी वारंवार मनोमन उद्धार करीत असे. अशा या नावडत्या भाज्यां मध्ये पानात पडणारी कैरीची चटणी म्हणजे एस्टी स्टँड वर झक्कपैकी जिन्स आणि फाकडू टॉप घालुन उभ्या असलेल्या मॉडर्न मुली सारखी लक्ष वेधून घ्यायची. कैरीची चटणी म्हणजे जीव की प्राण. तिच्या आधारावर आम्ही किती समरप्रसंगांना (भाज्यांना) तोंड दिले याला गिनती नाही ! मोसमातली पहिली कैरी हातात तिखट मीठ घेउन खाणे, कैरी विळीवर कापताना होणारा तो चर्र्र्र्र्रर आवाज, तो आंबट पणा, कैरीच्या छोट्या फोडींचे लोणचं हे सगळं आज आठवलं.

लोणचं! अहाहा.लोणच्याच्या कै-या आणणे हे एक काम मी आवडीने करायचो. या कै-या कापायची स्पेशल विळी असायची. मोठ मोठ्या फोडी कापणे आणि लोणच्याचे मिक्स तयार करने या कामात आईला मदत करायचो. कै-या कापल्यादिवशी जे लोणचं तयार होतं त्याची चव मदर्स रेसिपी किंवा केप्रची लोणची खाणा-यांना नाही कळायची.


पन्हं या पेयावर मात्र माझा आक्षेप आहे. कॉलेज मधला एखादा उडाणटप्पू नोकरी लागल्यावर जसा सरळ होतो किंवा एखादी स्वयंपाक घरात पाय न ठेवणारी "स्कॉलर" मुलगी लग्ना नंतर रांधायला लागते तसं काहिसं पन्ह्यात होतं असं मला वाटतं. कैरी उकडवून तिला मिळमिळीत करुन तिचा रंग फिका करुन हे प्येय बनविले जाते. चवीला चांगले असले तरी माला कैरीचे हाल केले गेले आहेत असंच वाटत राहतं.शक्यतो मी पन्हं टाळतो आणि प्रसंग आलाच तर चहाच्या गाळणीने गाळून पितो.

शेजा-यांच्या कै-या चोरण्याचे भाग्य अनेकांच्या नशिबी असेल पण आमच्या दूरदृष्टी शेजा-यांच्या अवकृपे मु्ळे घराच्या आजु बाजुला एकही आंब्याचे झाड नव्हते.त्यामुळे कै-या चोरण्याचे ऍडव्हेंचर फारसे काही हाती लागले नाही. पण मामाच्य गावी जातानाच्या रस्त्याच्या दुतर्फा आंब्याची झाडं असायची, त्यांच्या कै-या रस्त्यावरनं ही हाताला लागायच्या. कायनेटिक होंडावरुन जाता जाता तोडलेली ती एखादी कैरी स्पेशल असायची. त्या कैरीला तोड फक्त शाळे समोर मिळणा-या कैरीलाच. तीन मित्रां मध्ये एक कैरी शेअर करायचो. दात आंबायचे. आता त्यातला एक लोकांचे आंबलेले दात दुरुस्त करतो.(दंतवैद्य आहे !)

शाळा संपली. घर सुटले (शिक्षणासाठी, कसल्याही उपद्व्यापामुळे नव्हे) तशी कैरीची चटणी विरळा जाहली. मेस वाल्या काकुंना एवढ्या पोरांसाठी चटणी करणे म्हणजे हाताचे तुकडे पाडुन घेण्याचेच काम होते त्यामुळे मेसवर ती मिळणे अवघड होते. "ती" या सर्वनामावरुन आम्ही चटणीस संबोधितो आहोत. मेस वर मुली फार कमी होत्या. असल्या तरी त्यांचं अस्तित्व अमेरिकेतील रशियन एजंट्स सारखं होतं. म्हणजे ते आहेत हे सर्वांना ठाउक होतं पण नेमक्या कोण? त्यांची नावं काय? कुठे राहतात? महाविद्यालय कोणते? जेवायला केव्हा येतात? नाही आल्या तर त्यांच्या घरी मेस वरुन डबा कोण पोचवतो? याचा थांग पत्ता लागायचा नाही. मेस च्या काकूही अगदी मुद्सद्दी राजकारणी नवख्या पत्रकारांच्या प्रश्नांना जसा उडवून लावतो तशा आम्ही काही माहिती काढायचा प्रयत्न केला की उडवून लावायच्या.
पुढे अमेरिकेस आलो (हे वाक्य छाती फुगवून नसुन खेदाने आहे याची कृपया नोंद घ्यावी) आम्ही ज्या ठिकाणी विद्याग्रहण कराण्यास आलो होतो तिथे कैरीचा आणि आमचा दूरान्वयेही संबंध नसें. (चतुर वाचकांना द्वयार्थ ध्यानी आला असेल).अशा प्रकारे मागच्या ७-८ वर्षांमध्ये चांगली चटणी तोंडी लावता आली नव्हती.(इथे द्वयार्थ अपेक्षित नाही!)
आज वेब कॅम वर आमच्या बंधुराजांनी आम्हाला डिवचण्यासाठी कैरीच्या चटणीचे वाडगे दाखवले. मग आम्ही ही पेटलो. ’पटेल ब्रदर्स” मधून मेक्सिकन कै-या आणल्या. खलबत्ता छोटा असल्याने चार बॅचेस मध्ये दीड तास झटून चटणी बनवली.
(कृती पुढील अंका मध्ये)! अशा मेहनती नंतऱ गरम पोळी सोबतचा चटाणीचा तो प्रथम ग्रास आम्हास स्वर्गीय न भासेतों नवल !
जेवणाच्या पानात निग्रहाने कैरीची चटणी आणाण्यास आम्ही यशस्वी जाहलो, आता जीवनाच्या पानात कैरीची चटणी पडते की पालकाची पातळ भाजी हे पहावयचे !!

आपला
शब्दश:आंबट शौकीन

भित्यापाठी ब्रह्मराक्षस !

Category:

निलेश चा फोन आला आणि तो म्हणाला "अब्बे,ब्रेकिंग न्यूज". मी म्हटलं काय झालं बाबा आता? नाहीतरी पोल्ट्री मध्ये एका कोंबडीने मान टाकली की इतर सगळ्या कोंबड्या पटापट माना टाकतात त्याच गतीने आमचे मित्र कसली तरी लागण झाल्या प्रमाणे पटापट "कमिट" होत होते. मला वाटलं आता आणि कोण गेलं??...मनात पटकन उरलेल्या मित्रांचे चेहरे येवोनी गेले. पण त्यातल्या कुणा नराचे (पर्यायने नगाचे) अफेअर होईलसे असे कोणी शिल्लक नव्हते. मग मीच धीर न धरवल्याने विचारलं पटकन सांग बाबा कोणाचं ठरलं?
तो म्हणाला "अबे ठरलं नाही कोणाचं." मी म्हटलं मग? तसा तो म्हणाला "दिवा चा ऍक्सिडेंट झालाय !" मी जरा आश्चर्य चकित झालो आणि थोडा बेफिकिरही. कारण दिवाचा कसा काय ऍक्सिडेंट होणार? शक्यच नव्हतं ते. मला वाटलं खरचटलं बिरचटलं असेल. पण निलेश म्हणाला पायाचं हाड तुटलंय! रॉड टाकलाय. मग मात्र मी ते कसं शक्य असेल याचा विचार करु लागलो.
दिवा म्हणजे आमचा मित्र दिवाळकर. त्याचं नाव आम्ही दिवा ठेवलं होतं. अशाच शॉर्टफॉर्म्स चा एक किस्सा म्हणजे मी इंडियाला गेल्यावर कोणाला कधी भेट्णार आहे याचं वेळापत्रक बनवलं होतं.त्यात मी Nov 17th-Mala असं लिहून ठेवलं होतं. आमच्या मोठ्या बंधुराजांना आणि मित्रांना ती फाईल पाठवली. लोकांना माला कोण हा प्रश्न पडला. साल्याने कुठे सूत तर जुळवले नाही ना असे मित्र बोलू लागले. लाभले भाग्य आम्हास न ते..हे आमचे मित्र काही समजून घ्यायला तयार नव्हते. आमचा खुलासा Mala म्हणजे माझा इंजिनिअरिंगचा मित्र "माळाकोळीकर". त्याचं अख्खं नाव कुठे लिहित बसा म्हणून फक्त Malaच लिहिलं. या थेअरीवर कोणी विश्वास ठेवेना. होता होता त्यांना ते मान्य झाले.

तर दिवाचा ऍक्सिडेंट होणे म्हणजे एखादा चवथी पाचवीतला मुलगा "भलत्या" आरोपांसाठी पकडला जाण्या सारखे होते! आता का? दिवा तसा एकदम पापभीरु वगैरे कॅटेगरी मधाला पोरगा. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग च्या आमच्या वर्गात होता. त्याला पाहून तो मेकॅनिकल मध्ये इंजिनिअरिंग करणार यावर विश्वासच बसत नसे. एकदा आम्ही असेल आमच्या कॅन्टिन जवळ कटिंग पीत उभे होतो. तिथे काही ऍटलस सायकली "पार्क" केल्या होत्या. (लहानपणी मला NO Parkingच्या बोर्डचा अर्थ उद्यानात खेळण्यास मनाई आहे असाच वाटायचा!असो). तर आम्ही असेच बोलता बोलता कोणाचा तरी धक्क लागला आणि एका ऍटलस चे स्टँड निघाले. ते मेन स्टँड असते ना ते. म्हणजे जे लावण्या साठी सायकल ओढावी लागते ते. दिवा जवळच उभा होता. मी म्हटलं दिवाला "अरे मी धरलीये सायकल तू स्टँड लाव". यावर दिवाने जे काही उत्तर दिलं होतं ते अगदी ऐतिहासिक होतं! म्हणजे कॉलेज च्या मेकॅनिकल इंजिनिअरींग च्या इतिहासात बोल्ड अक्षरांनी लिहून ठेवावं असं. आमच्या कडे असाही एक विद्यार्थी होवोनी गेला!! काही अंदाज करायला जाउ नका. त्याचं ते ऐतिहासिक उत्तर होतं "मला स्टँड लावता येत नाही ..."
ऐकणारे सगळे गार झाले.मला वाटलं लेकराची ऐकण्यात काही गडबड झाली असेल म्हणून पुन्हा सांगितलं..अबे सायकलचं स्टँड म्हणतोय मी. त्यावर पठ्ट्याचं उत्तर अगदी मंद आवाजात "अरे मला येत नाही"!! काय रिऍक्शन द्यावी हेच कळेना.मी मग भनकलो. अबे मेकॅनिकल ला आला ना तू साधं सायकलचं स्टँड लावता येत नाही.
त्या प्रसंगापासून मी नेहमी त्याची शाळा घ्यायचो. प्रश्न विचारायचो आणि फुकटात ज्ञानदान करायचो. टपल्या मारायचो त्याला डिवचायचो. त्याची रिऍक्शन एकच यायची. "निल्या तू जरा व्यवस्थित रहा!!!"
सांगायचा उद्देश. आमचा दिवा हा असा होता. त्याचा आणखी एक गुण म्हणजे त्याला कुठचीही टू व्हिलर येत नसे. अजूनही येत नाही. इंजिनिअरींग ची चारही वर्षे तो कोणाच्यातरी पाठकुळीला बसून येत असे. एकदा तर मी त्याला पल्लवीच्या स्कूटी मागे बसून जाताना पाहिलंय. अगदी विलोभनीय होतं ते चित्र. हा गोंडस सभ्य बाळ तिच्या मागे त्याचं ते टिपिकल दप्तर घेउन बसलेला.
दिवाने अयुष्यात कधी गाडी चालवली नाही आणि आपल्याला येत नाही याचं फारसं काही वाटत नव्हतं. या जनरेशन मध्ये गाडी न येणं म्हणजे दुसर्यावर किती डिपेंडंसी. पण मामा कडे वगैरे जाताना हा रिक्षाकरुन जायचा.त्याला सगळे मित्र डिवचायचे त्यामुळे शिकण्याचा निर्धार करुन त्याने एक दिवस स्कूटी चालवायचे ठरवले. अनुराग पत्क्याने आपल्या स्कुटीची तमा न बाळगता त्याला शिकवण्यासाठी व्हॉलंटिअर केलं. त्या दिवशी दिवा स्कूटीला घेउन धडपडला. पतक्याच्या गाडीची नुसकानी झाली आणि दिवाची गाडी शिकण्याची शेवटली संधी पण हुकली.

दिवा एकदम सरळ मनाचा निष्कपट माणूस.कसलीही डिमांड नसलेला. त्यामुळेच तो आमचा खास बनला. फर्स्ट इयर ला आमच्या ड्रॉईंगशीट पण बनवून द्यायचा. जमेल त्याला जमेल तशी मदत तो करायचा. नंतर नोकरी लागल्यावर साहेबांच्या घरी कंपनीची बस यायची. अगदी स्कूलबस जशी पोरं गोळाकरत फिरते तशी यांच्या कंपनीची बस फिरायची म्हणून साहेबांचं भागत होतं. मग औरंगाबाहून दिवा पुण्याला चांगला जॉब मिळाला म्हणून आला होता.
इकडे पण तो पेम्टी (PMT)नेच फिरायचा. त्याचा ऍक्सिडेंट व्ह्यायचा म्हणजे पेम्टीच पलटायला हवी होती. काही समीकरण लागत नव्हतं.नक्की काय झालंय हे विचारावं म्हणून त्याला फोन केला.

मी "काय दिवा धडपडलास म्हणे ! कुठे आहेस आत्ता?" दिवा- "अरे संचेती मध्ये आहे. पायाचं हाड तुटलंय. रॉड टाकलाय. उद्या एक ऑपरेशन आहे." मी "होय काय. कसं आहे रे हॉस्पिटल? च्यायला नेहमी बाहेरनंच पाहायचो मी! सही आहे तू आत गेलास." दिवा अजिबात न चिडता हॉस्पिटल बद्दल सांगायला लागला. मग मी त्याला आजुबाजुला चांगल्या पेशंट्स कोणी असतील तर सूत जुळवून टाक असा सल्ला दिला. दिवा म्हणाला"अरे काय घेउन बसलायसं. हाड जुळवायला आलोय मी इथे सूत नाही". तर पहिली ५ मिनिटे अशा संवादात गेल्यानंतर मी विचारलं "अबे ते जाउ दे आता ऍक्सिडेंट कसा झाला ते सांग."

तर त्याचं असं झालं होतं की साहेब पिम्टी मधून जात होते. स्टॉप आला आणि दिवा उतरायला लागला. उतरुन एक सेकंद होतो ना होतो तोच समोरुन एक सुमो येउन याच्या पायावर धडकली. पायाच्या हाडाचे किटकॅट चॉकलेटच्या जाहिरातीत करतात तसे तुकडे झाले! लोक गोळा झाले. याला त्याच सुमो मध्ये टाकून हॉस्पिटलला नेण्यात आले. एक ऑपरेशन त्याच दिवशी झाले. दुसरे एक दोन दिवसात करायचे आहे. तो म्हणत होता "अरे हाड तुटलं ते दिसत होतं मला". मी म्हटलं अरे लेका मग मोबाईलच्या कॅमे-याने फोटो नाही का घ्यायचास !!


अशा मस्करी नंतर त्याला जगाचा न्यायच असा आहे हे समजावलं. आपण धावत पळत स्टॉप वर पोचल्यावर कळतं की बस अत्ताच गेली. आपण जेव्हा वेळेच्याआधी पोचतो नेमकी त्या दिवशी बस लेट असते. भरपूर अभ्यास केलेल्या सब्जेक्ट मध्येच कसेबसे ४० येतात. न अभ्यास केलेल्या विषयात मटका लागतो. नेमका आपण स्किप केलेले प्रॅक्टिकल (किंवा प्रोग्राम) आपल्याला परीक्षेमध्ये येतो मग बदलून घेण्याचे ५ गुण वजा होतात. अख्ख्या बॅच मध्ये असं करणारे नेमके आपणच असतो. परीक्षेमध्ये सर्रास चिठ्ठ्या मारणारे कधी न पकडले जाउन रिकाम्या जागा भरा मधली एखादी रिकामी जागा आपण कोणाला तरी विचारतानाच परीक्षकाचे लक्ष आपल्याकडे जाते. एखाद्या मुलीला शाळेत असताना आपण आवडत होतो हे आपले लग्न झाल्यावरच कळते.टिचिंग अस्टिंटशिपची जागा आपल्याच मित्राला मिळाल्यावर ती गेल्याचे कळते! आपण इंडियाचं तिकिट काढल्यावर नेमकं दोन चार दिवसांनीच ते २००$ नी स्वस्त होतं! इकॉनॉमी मधनं बिलियन्स ऑफ डॉलर्स आरामात नेणा-यांना काही होत नाही आणि एखाद्या रविवारी दुपारी बाबा झोपले आहेत हे पाहून त्यांच्या पाकिटातनं ५ रुपये काढताना आपणच पकडले जातो !

तर लोकहो स्कंध पुराणाचा हा अपघाताध्याय अम्ही इथेच संपवतो. तयाचे तात्पर्य हेच की कोणासोबत काहीही होउ शकते. हे आता आम्ही ध्यानात घेतले आहे.दिवा चा ऍक्सिडेंट होउ शकतो तर माझे पण एक दिवस लव्ह मॅरेज झाले तरी त्याचे फारसे आश्चर्य मानुं नयें !



आपला(अभिलाषी)
अभिजित!

भरली वांगी

Category:



ही रेसिपी खास माधवी साठी. भाजीला सुरुवात करण्या पूर्वी एकदा अटॅच केलेले फोटो मोठे करुन पहा.
वांगी(वांगे काही म्हणा) देठ काढून देठाच्या बाजूने उभ्या चार चिरा देउन पाण्यात टाकावीत. आता थोडावेळ त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही(वॉल मार्ट मध्ये वांगं म्हनूण नुसतंच साईझ ने मोठं आणि चवीने शून्य असं काही मिळतं त्यावर हा प्रयोग करु नये.)
या भाजीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मसाला प्रिपरेशन.
मसाला:
दोन मोठे कांदे (अमेरिकेत/इतरत्र असल्यास एकच मोठा कांदा)बारीक चिरावे. ते तसे न चिरल्यास मसाला नीट होत नाही. बारीक चिरा अथवा किसा (कांद्याला! पावभाजीवाला कसा बारीक चिरतो अगदी तसं. तदनंतर मुठभर किसलेले सुके खोबरे व २ चमचे तीळ (नसले तरी चालतं)तव्यावर भाजून घेणे. हे किसलेल्या कांद्यात मिसळा.

लाल तिखट १ चमचा, काळा मसाला, मीठ, खवलेला ओला नारळ, कोथिंबिर, एक चमचा तेल, दाण्याचे कूट २ चमचे, थोडा गूळ घालून मस्त मिक्स करुन घ्यावं. वांगं वातुळ असतं म्हणून त्यात गूळ घालावा हे "मातीच्या चुली" पाहून एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच.
आता मसाला वांग्यात भरुन घ्यावा. थोडा मसाला बाजुला काढून ठेवावा.

भाजी:
जाड बुडाच्या पातेल्यात तेल,मोहरी,हिंग,हळद घालून फोडणी करावी. त्यात मसाला भरलेली वांगी टाकुन फ्राय करुन घ्यावीत. चांगली फ्राय झाली पाहिजेत.थोड्या वेळाने थाळीत पाणी भरुन ते भाजीच्या भांड्यावर ठेवावे.गॅस बारिक ठेवावा. दोन वाफा येउ द्याव्यात. म्हणजे वांगी शिजतील.(अमेरिकेतली वांगी शिजायला जास्त वेळ लागतो. कधी कधी बाहेरचं आवरण करपतं आणि आत कच्चं राहतं. सो मंद गॅस इज द की)

आता सिंपल आहे मघाशी थाळ्यात ठेवलेलं पाणी आत टाकावं, चिंचेचा कोळ करुन तो त्यात टाकावा. आणि सुरुवातीला काढून ठेवलेला मसाला आता टाकावा. अभी मिक्स करनेका आणि थोडा ढवळनेका. पण वांगी तोडनेका नही.मग झाकण ठेवणेका.
रस किती पाहिजे त्यानुसार पाणी टाकून वांगी पूर्णपणे शिजवावीत.

सजावट:
ओलो खोबरे आणि कोथिंबीर घालून छान सजवावे.

टीप:
१. जाड बुडाचे पातेले नसेल तर तवा ठेवावा त्यावर भांडे ठेवावे.
२. पाणी घालण्या आधी वांगी परतणे महत्त्वाचे आहे अन्यथा भाजी पाणचट होते.